मुंबई : गणेशोत्सव अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. अशातच गणपती बाप्पा मुंबईतून थेट भारत-पाकिस्तान सीमेवर जाण्यास तयार झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील पूँछ परिसरातील भारत-पाकिस्तान सीमेवर गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.


पूँछ परिसरात राहणाऱ्या किरण ईश्वर या काश्मिरी पंडित महिला यंदा गणेशोत्सव साजरा करणार आहेत. भारत-पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळील परिसरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाणार असून, दहा दिवसांचा उत्सव असेल.

सैनिकांनाही बाप्पाचा आशीर्वाद घेता यावा, यासाठी आपण गणपतीची प्रतिष्ठापना करत असल्याचे किरण ईश्वर यांचे म्हणणे आहे.

मुंबईतील मूर्तीकारांच्या 15 दिवसांच्या अथक मेहनतीने बाप्पाची ही खास मूर्ती साकारली आहे. मुंबईहून गणपती बाप्पाची मूर्ती जम्मूत नेली जाणार असून, तिथून मग सैनिकांच्या सुरक्षेत पूँछपर्यंत बाप्पाची मूर्ती नेली जाईल.

खरंतर भारतीय सैनिकांची ताकद पाहूनच दहशतवादी घाबरुन असतात. मात्र आता सैनिकांना गणपती बाप्पांचा आशीर्वादही मिळणार आहेत.

मुंबई-पुण्यात ‘पेशवा’, ‘महानायक’, ‘राजा’, ‘महाराजा’ अशी गणपतीला नावं दिली जातात, त्याच धर्तीवर पूँछमधील या गणपती बाप्पाला ‘किंग ऑफ एलओसी’ असे म्हटले जाणार आहे.

गेली दोन वर्षे किरण ईश्वर या पूँछमध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. या बाप्पामुळे आपल्या सैनिकांना धीर मिळेल आणि बाप्पाच्या आशीर्वादामुळे सीमेवरील तणावही कमी होईल, अशी किरण ईश्वर यांनी आशा व्यक्त केली आहे.