भिवंडी : भिवंडी शहरातील  राजीव गांधी उड्डाणपुलाच्या खालचा स्लॅब आज सकाळी कोसळला. भिवंडी बस स्थानकाच्या बाजूला सकाळच्या सुमारास कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर मनपा प्रशासनाचा हलगर्जी आणि बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.


2003 ते 2006 या तीन वर्षांच्या काळात हा उड्डाणपूल बनवण्यात आला होता. सुरुवातीला 15 कोटी रुपये या उड्डाणपुलाच्या कामासाठी मंजूर झालं होतं. मात्र काम पूर्ण होईपर्यंत या उड्डाणपुलासाठी एकूण 22 कोटी रुपये खर्च करण्यात आले. जय कुमार अँड कंपनीने हा उड्डाणपूल बनवण्याचा ठेका घेतला होता.

2006 साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले होतं. या उड्डाणपुलाला  राजीव गांधी उड्डाणपूल असं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर 2013 साली या उड्डाणपुलावर कडकड असा आवाज येत असल्याने तत्कालीन सिटी इंजिनियरने जय कुमार कंपनीला त्यासंदर्भात अर्ज केला असल्याची माहिती मिळते. त्यावेळी जय कुमार कंपनीच्या इंजिनियर टीमने उड्डाणपुलाची पाहणी केली होती आणि ब्रीज वाहतुकीस चांगला असल्याचा अहवाल दिला होता. तसंच उड्डाणपुलावर पाणी साचू देऊ नये अशा सूचनाही मनपा प्रशासनास केल्या होत्या ,

मात्र या सूचनांकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे उड्डाणपुलावर दरवर्षी पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पाहायला मिळतं. एबीपी माझाने वारंवार उड्डाणपुलाची दूरवस्था दाखवली होती. तरीही मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच उड्डाणपुलाला तडे गेले असून सद्यस्थितीत हा ब्रीज नादुरुस्त आहे. विशेष म्हणजे आधी उड्डाणपुलासाठी कोट्यवधी रुपये केले आहेत. त्यातच महापालिकेने उड्डाणपुलासाठी आणखी 50 लाखांपेक्षा जास्त पैसे खर्च केले आहेत.