मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या तुफान पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचलं. यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पण आता याच पावसाचा फटका राज्यात आणि केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्यांनाही बसला आहे.


भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा हे मुंबईत आले होते. त्यावेळी राज्यातील भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यासोबत दादरमधील भाजप कार्यालयात जाताना संबित यांची चांगलीच दैना उडाली . हे दोघेही  पाणी तुंबलेल्या रस्त्यावरुन वाट काढत असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.

2017 साली झालेल्या महानगरपालिका निवडणूकीत 82 जागांचं संख्याबळ भाजपला मिळालं होतं. तेव्हा आपण थेट सत्तेत न जाता महानगरपालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावू, असं भाजपने म्हटलं होतं. जागोजागी साचलेल्या पाण्याने मुंबईकरांचे हाल होत असताना महानगरपालिकेतील दुसऱ्या क्रमांवर असणारा भाजपलाही जबाबदारी झटकता येणार नाही, असं सर्वसामान्यांचं म्हणणं आहे.

तुंबलेल्या पाण्याचा फटका आता भाजप प्रवक्त्यांनाच बसल्यानंतर प्रशासनाच्या कारभारात सुधारणा होण्यासाठी भाजप काही प्रयत्न करणार का, हे पाहावं लागेल.

काँग्रेसचा ट्विटरवरुन निशाणा

संबित पात्रा यांनीच भाजप – शिवसेना युतीचा भ्रष्ट कारभार सर्वांसमोर आणला, असं काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.