कल्याण : धोकादायक बनलेला कल्याणचा पत्री पूल अखेर पाडण्यात येणार आहे. 24 तारखेपासून पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असून कल्याणमध्ये पार पडलेल्या सर्व विभागांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


तब्बल 104 वर्षे जुना असलेला हा पूल धोकादायक बनल्याची बाब जुलै महिन्यात करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समोर आली होती. यानंतर या पुलावरुन होणारी अवजड वाहनांची वाहतूक तातडीनं थांबवण्यात आली होती.

तसेच, हा पूल लवकरात लवकर पाडण्याच्या सूचनाही केडीएमसीला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज केडीएमसी मुख्यालयात ससर्व विभागांची बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वे, एमएसआरडीसी, केडीएमसी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पत्री पुलावरील वाहतूक उद्यापासून थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर त्यानंतर दोन दिवस पुलावरील युटिलिटी सर्व्हिसेस काढल्यानंतर 24 ऑगस्टपासून हा पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. रेल्वेकडे या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.

यानंतर पुढच्या तीन महिन्यांत एमएसआरडीसी मार्फत हा पूल पुन्हा नव्यानं उभारला जाणार आहे. त्यामुळे कल्याण शहरातला हा ऐतिहासिक पत्री पूल आता लवकरच इतिहासजमा होणार आहे.

दरम्यान, पत्री पूल पाडल्यामुळे कल्याण आणि डोंबिवलीत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार असून त्याचं नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाला मात्र सतर्क राहावं लागणार आहे.