नॉटिंगहॅम  (इंग्लंड):  टीम इंडियाने नॉटिंगहॅम कसोटीत दिलेल्या 521 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद 23 धावा केल्या आहेत.


या कसोटीत भारतानं आपला दुसरा डाव सात बाद 352 धावसंख्येवर घोषित केला. त्यामुळे पहिल्या डावातील 168 धावांच्या आघाडीमुळे इंग्लंडसमोर 521 धावांचं आव्हान आहे.

या कसोटीत इंग्लंड संघ पूर्णपणे पिछाडीवर गेला आहे. सध्याची भारताची स्थिती पाहता, एखादा चमत्कारच इंग्लंडला पराभवापासून रोखू शकतो.

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत 0-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून भारताला मालिकेत पुनरागमन करण्याची संधी आहे.

विराट सेनेकडून ज्यो रुटच्या इंग्लंड टीमला चीत करण्यासाठी दोन दिवस आहेत. त्या तुलनेत भारताने दिलेलं लक्ष्य विशाल आहे. इंग्लंडला अजूनही 498 धावांची गरज आहे. त्यामुळे भारताचा विजय आता एखादा चमात्कारच रोखू शकेल.

टेंट ब्रिजमध्ये काय आहे रेकॉर्ड?

टेंट ब्रिजच्या मैदानात लक्ष्याचा पाठलाग करणं तसं सोपं नाही आणि तितकंस अवघडही नाही. यापूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये  मिडिलसेक्स संघाने नॉटिंघमशायरचं 502 धावांचं लक्ष्य पार केलं होतं.

तर कसोटीमध्ये इंग्लंडने दुसऱ्या डावात न्यूझीलंडविरुद्ध 284 धावांचं आव्हान पूर्ण केलं होतं.

विराटच्या शतकाने भारताला आघाडी

या कसोटीत कर्णधार विराट कोहलीनं झळकावलेल्या शतकानं टीम इंडियाला मोठी आघाडी मिळवून दिली. त्यानं शतक साजरं केलंच, पण चेतेश्वर पुजाराच्या साथीनं 113 धावांची भागीदारीही रचली.

भारतीय कर्णधारानं दहा चौकारांसह 103 धावांची खेळी उभारली. विराटचं इंग्लंड दौऱ्यावरचं हे दुसरं शतक ठरलं. या शतकानंतर विराट आणि स्टेडियममध्ये बसलेली त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी एकमेकांना फ्लाईंग किस देऊन तो क्षण साजरा केला.

भारताकडून पुजारानं 72 धावांची आणि हार्दिक पंड्यानं नाबाद 52 धावांची खेळी केली.

संबंधित बातम्या

नॉटिंगहॅम कसोटीवर भारताची मजबूत पकड, इंग्लंडसमोर 521 धावांचं लक्ष्य  

'मला कपिल देव व्हायचं नाही, हार्दिक पंड्याचं राहू द्या'