कल्याण : कल्याणच्या धोकादायक पत्री पुलाच्या पाडकामाला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. गणपती उत्सव आणि मुंब्रा बायपासचं काम पूर्ण होईपर्यंत हा पूल सुरु ठेवावा, यासाठी स्वतः एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्नशील असल्याचं समोर आलं आहे.


एकीकडे मुंब्रा बायपासचं काम सुरु असल्यामुळे नवी मुंबई आणि पुण्याकडून भिवंडी, नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीचा भार कल्याण शहरावर पडला आहे. त्यातच पत्री पूल बंद केल्यापासून कल्याण शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यात गणपतीचा सण तोंडावर आल्याने लोकांना वेठीस धरणं योग्य नसल्याची भूमिका केडीएमसीच्या महापौर विनिता राणे आणि आयुक्त गोविंद बोडके यांनी घेतली आहे.

कल्याणचा पत्री पूल धोकादायक, लवकरच पूर्णपणे बंद होणार

याबाबत त्यांनी एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. यावेळी आयआयटी मुंबईच्या ज्या तज्ज्ञांनी पत्री पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं, त्यांच्याकडून पुन्हा एकदा पुलाची तपासणी केली जाईल आणि तात्पुरती डागडुजी करणं शक्य असल्यास मुंब्रा बायपासचं काम आणि गणपती उत्सव संपेपर्यंत हा पूल हलक्या वाहनांसाठी सुरु केला जाईल, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.