मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याने तरुणांच्या विषयासंबंधी आवाज उठवत, राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत. शहरी भागातील तरुणाई डिप्रेशनमध्ये जात असताना, आपण स्मार्ट सिटीच्या बाता ठोकतोय, अशा शब्दात पार्थ पवार यांनी ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


पोद्दार इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनने (पीआयई) जानेवारी ते जून 2018 या काळात मुंबई, बंगळुरु आणि चेन्नईत सर्वेक्षण केले. यातून त्यांनी तरुणाच्या समस्या जाणून घेतल्या. ही बातमी मुंबई मिरर वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या बातमीची लिंक पार्थ पवार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केली आणि त्यावर आपलं मतही व्यक्त केले.

पार्थ पवार यांनी सर्वेक्षणाच्या बातमीची लिंक शेअर करुन, त्यावर आपलं मत व्यक्त करताना म्हटले की, “देशातील महत्त्वाच्या शहरांमधील बहुतांश तरुणाई डिप्रेशनमध्ये जात असताना, आपण ‘स्मार्ट सिटी’च्या गोष्टींवर चर्चा कशी काय करु शकतो? आपण भुतानसारख्या देशांकडून शिकलं पाहिजे, कारण तिथे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा देशातील नागरिक आनंदी राहण्याला प्राधान्य दिले जाते.”

पार्थ पवार यांनी शेअर केलेल्या सर्वेक्षणाच्या बातमीत काय म्हटलंय?

मुंबईतील 750, बंगळुरुतील 500 आणि चेन्नईतील 650 तरुण-तरुणांचं सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये 14 ते 25 या वयोगटातील तरुण-तरुणांचा समावेश होता. यात सहभागी तरुण-तरुणी विशेषत: रेल्वे स्थानक, कॉफी शॉप्स आणि मॉल येथे काम करणारी किंवा तिथे सर्वेक्षणावेळी उपस्थित असणारी होती.

मुंबईतील 750 तरुण-तरुणांपैकी 64 टक्के जणांनी डिप्रेशनच्या काळात आत्महत्या करण्याचा विचार केला होता, तर त्यातून जे वाचले होते, ते पुन्हा प्रयत्न करण्याच्या विचारात होते, अशी धक्कादायक आकडेवारी या सर्वेक्षणातून समोर आली.

डिप्रेशनमध्ये असताना तुम्ही काय करता, असे मुंबईतील तरुण-तरुणींना विचारले असता, तर त्यातील 38 टक्के जणांनी ड्रग्जचा पर्याय निवडतात, 17 टक्के जण धुम्रपान करतात, असे सांगितले.

एकंदरीत अत्यंत धक्कादायक माहिती आणि आकडेवारी पोद्दार इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनच्या सर्वेक्षणात समोर आली आहे. आणि याच आकडेवारीची दखल घेत पार्थ पवार यांनी या तरुणाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.