कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचे 400 कंत्राटी सफाई कामगार उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे उद्यापासून कल्याण-डोंबिवलीत कचराप्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


कल्याण डोंबिवली महापालिकेत तयार होणारा कचरा डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकण्याचं काम हे 400 कामगार करत असतात. यांच्यापैकी 120 चालक, तर 280 कामगार आहेत. गेल्या दीड वर्षांपासून केडीएमसीसाठी काम करणाऱ्या या कामगारांना मागील 3 महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही.

पगाराविना घर चालवायचं कसं? असा प्रश्न या कामगारांना पडला आहे. याबाबत केडीएमसी आयुक्त, प्रशासन यांच्याकडे अनेकदा चकरा मारूनही काहीही फरक पडलेला नसल्यानं अखेर उद्यापासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय या कामगारांनी घेतला आहे.

कामगारांच्या संपावर गेल्याने कल्याण-डोंबिवलीत कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.