मुंबई : आपल्या हातात सत्ता नाही म्हणून काही लोक सध्या अस्वस्थ आहेत. त्या नैराश्यपोटी ते सरकारविरोधात हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे लोकांमध्ये जावून काम करत आहेत. त्यामुळे लोकांचा सरकारवर विश्वास आहे. भाजपने काही प्रयत्न केले तरी ते सफल होणार नाही. सरकार खंबीर आहे, 15 वर्षे टिकणार, असा विश्वासही जयंत पाटलांनी व्यक्त केला.


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लवकरच याबाबत निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कोणीही काम करणार नाही याची मला खात्री आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

कोरोनाचं एवढं मोठं संकट असताना मध्य प्रदेशात भाजपने काँग्रेसचे सरकार पाडले. संकटाच्या काळातही भाजपच्या मंडळींना सरकार पाडण्याचं सुचतं ही दुर्दैवी बाब आहे. जनतेचे काय होईल याचे घेणेदेणे नाही. भाजप फक्त राजकारणाला प्राधान्य देतं हे यातून स्पष्ट होतं. कोरोनासाठी येणारी मदत जर पंतप्रधान केअरला दिली तरच सीएसआर फंड म्हणून गणली जाईल, राज्य सरकारला दिली तर नाही, असा बातम्या आल्या होत्या. हे खोट्या प्रवृत्तीचं लक्षणं आहेत. भाजप राजकारणात मश्गुल आहे, हे देशातील जनतेला कळून चुकलं आहे, अशी टीकाही जयंत पाटलांनी केली.

राज्याच्या तिजोरीत सध्या काहीच नाही. मार्चमध्ये लोक मोठ्या प्रमाणात कर भरत असतात. मात्र लॉकडाऊनमुळे लोकांना ते करता आलं नाही. राज्याला आर्थिक चणचण भासणार, मात्र महाराष्ट्र हे सक्षम राज्य आहे. महाविकासआघाडी सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्र या संकटाला तोंड देणार, असंही जयंत पाटलांनी सांगितलं.

देशभरात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहे. राज्याला सर्वात जास्त केंद्राच्या मदतीची गरज आहे. पण तसं सहकार्य मिळत असल्याचे अनुभव नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याच्या अर्थमंत्री अजित पवार यांनी मागण्यांचे जे पत्र लिहिले त्याला अजून उत्तर आले नाही, अशी माहिती जयंत पाटलांनी दिली. तसेच जिथे रुग्णांची संख्या कमी आहे तिथे लॉकडाऊन शिथिल करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. ग्रामीण भागात अर्थव्यवस्था सुरळीत करावी लागेल. ग्रामीण भागातील उत्पन्न वाढवावे लागेल. या सगळ्यात बाहेर पडण्याची आपल्याला सुरुवात करावी लागेल, असंही जयंत पाटलांनी सांगितलं.

सध्या महाराष्ट्रात किंबहुना जगावर मोठे संकट ओढावले आहे. या संकटाला घरीच राहून आपल्याला पराभूत करता येणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, विविध सेल सर्वच जण सामान्यांच्या मदतीला धावून जाताना दिसत आहे. कोरोनाचा हे संकट लवकर टळू हेच प्रयत्न आहेत, असं जयंत पाटलांनी सांगितलं.

संबंधित बातम्या