IPL 2022 : संपूर्ण जगाला भूरळ घालणारी क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (IPL). जगभरातल्या आजी माजी स्टार खेळाडूंचा भरणा आयपीएलमध्ये असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा संपूर्ण आयपीएल मुंबई आणि आसपासच्या परीसरात आयोजित करण्यात आलं आहे. त्यामुळे पालक संघटना या नात्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशन सध्या कमालीचं व्यस्त असणं स्वाभाविक आहे. मात्र त्यामुळे मुंबई पोलिसांवरही सुरक्षा व्यवस्थेचा प्रचंड ताण पडणार आहे. गणपती, दिवाळी, पाडवा, इ. सणांमध्ये आता आयपीएल या आणखी एका सणाची पोलिसांकरता बंदोबस्ताच्या वेळापत्रकांत वाढ झाली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र आयपीएलसाठीचा बंदोबस्त हा खाजगी वर्गात मोडत असल्यानं तो सशुल्क आहे. त्या बंदोबस्तासाठी आलेल्या खर्चाचं रितसर बिल त्या त्या पालक संघटनेला मुंबई पोलिसांकडून पाठवण्यात येतं. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशननं याच बंदोबस्ताचं मुंबई पोलिसांचे 15 कोटी रूपये गेल्या दहा वर्षांपासून दिलेले नाहीत.


मात्र माहितीच्या आधिकारात समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षांत मुंबई क्रिकेट असोसिएशननं (Mumbai Cricket Association) 8 सामन्यांचे मिळून तब्बल 15 कोटी रूपये अद्याप राज्य सरकारला दिलेले नाहीत. ज्यात साल 2013 मधील महिला विश्वचषक, साल 2016 मधील टी 20 विश्वचषक आणि काही कसोटी सामने, साल 2017-18 मधील आयपीएल या सामन्यांचा समावेश आहे. या सर्व सामन्यांचे मिळून एकूण 14 कोटी 82 लाख 74 हजार रूपये पोलिसांनी पुरवलेल्या सुरक्षेचा खर्च आलाय, जो अद्याप दिलेला नाही. या थकीत रकमेवर 9.5 टक्के दरानं व्याजही आकारण्यात आलं आहे. मात्र तरीही यंदा मुंबई पोलिसांनी कुठलही कसर न ठेवता आपली सुरक्षा पुरवली आहे, हे विशेष. या वसुलीसाठी पोलीस प्रशासनाकडनं एमसीएला तब्बल 35 पत्र पाठवण्यात आलीत. मात्र संघटनेनं एकाचंही उत्तर दिलेलं नाही. इतकंच काय तर साल 2019-20 या कालावधीत वानखेडेवर आयोजित केलेल्या सामन्यांसाठी सुरक्षेचा खर्च काय दरानं आकारायचा?, यावर शासन दरबारीच अद्याप निर्णय झालेला नाही. त्याकरता गृह विभागाच्या अप्पर सचिवांना तब्बल 9 वेळा पत्र पाठवून त्यांच्याकडनंही अद्याप यावर उत्तर आलेलं नसल्याचं पोलिसांनी माहिताच्या अधिकारात आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांना उत्तर दिलं आहे.


कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी आयपीएल अर्ध्यावर थांबवून कालांतरानं ती दुबईत पूर्ण करण्यात आली. मात्र यंदा परिस्थिती नियंत्रणात असली तरी कोणतीही जोखीम न पत्करता आयपीएलचे 70 प्राथमिक फेरीचे सामने मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुण्यातील गहुंजे इथल्या स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर बाद फेरीचे 4 सामने अहमदाबादच्या नव्या स्टेडियमवर खेळवण्यात येतील. यापैकी केवळ मुंबईचा विचार केला तर 36 सामने निर्विघ्नपणे पार पाडणं ही सुरक्षेच्यादृष्टीनं मुंबई पोलिसांची जबाबदारी आहे. याशिवाय खेळाडूंचं वास्तव्य असलेल्या पंचतारांकीत हॉटेलबाहेर अहोरात्र दिलेला पहारा वेगळाच. त्यामुळे मुंबई पोलिसांवर पुढचे दोन महिने किती ताण असेल?, याची आपल्याला कल्पना येईल.


आंतरराष्ट्रीय सामने असोत किंवा आयपीएल या आयोजनातनं पालक संघटनेला सर्व खर्च वगळता बक्कळ रक्कम उत्पन्न म्हणून मिळते. एकट्या आयपीएलची एका मोसमाची उलाढाल हजारो कोटींच्या घरात जाते. त्यामुळे यातून मिळणा-या उत्पन्नाची कल्पना न केलेलीच बरी. मात्र असं असतानाही मुंबई पोलिसांचे पैसे अद्याप का थकवण्यात आलेत?, बरं मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांचा समावेश आहे हे काही वेगळं सांगायला नको. अगदी मुख्यमंत्र्यांपासून, विरोधीपक्षातील नेत्यांपर्यंत ते अगदी गृहखात्याची जबाबदारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही एमसीएशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यत्यक्षपणे संबंध येतो. त्यामुळे यंदातरी मुंबई पोलिसांचे हे थकीत पैसे अदा केले जातील अशी अपेक्षा आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :