मुंबई : टी 1 वाघीण मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक शेषराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य डॉ. बिलाल हबीब, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितिन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील.


सदर समिती टी 1 वाघीण मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने अवलंबिली गेली किंवा नाही याबाबत वस्तुस्थिती दर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे.

या प्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र 'अवनी'ला मारण्याचे राजकारण केले जात असल्याचे सांगत सुधीर मुनगंटीवार यांचा राजीनामा मागितला जातोय, तो चुकीचा आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुनगंटीवार यांना क्लीनचिट दिली आहे.  गडकरी यांनी अवनी वाघिणीला मारण्यावरून सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. कुठल्याही उद्योगपतींसाठी जमीन दिली जात नसल्याचेही ते म्हणाले. या वाघिणीनं 13 आदिवासींना मारले त्याबाबत कुणीही बोलत नाही, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

राज्यातील राजकारण्यांनी जे आरोप केले त्याबाबत कीव येत असल्याचे सांगत मुनगंटीवार यांचा राजीनामा मागितला जातोय, तो चुकीचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. नरभक्षक टी1 वाघिणीला ठार केल्यानंतर आता राजकारण तापायला लागलं आहे. वन विभागाने बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच अवनी वाघिणीचा बळी घेतल्याचा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. वन्य कायद्यानुसार एखादा वन्य प्राणी जर हिंसक बनत असेल तर त्याला बेशुद्ध करुन पकडणं, असा नियम आहे. मात्र अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार मारण्यात आलं असून याचा आम्ही निषेध करत आहोत, असं जयंत पाटील म्हणाले होते. वन विभागाला ही हिंसक वाघीण दिसली मात्र वनक्षेत्रात लाकूड आणि प्राण्यांचे अवशेष चोरले जात आहेत याकडे मात्र या खात्याचे लक्ष नाही. वन विभागाने फक्त उद्योगपतींसाठी अवनी या वाघिणीचा बळी घेतला असून याचा जाब आम्ही वन्य अधिकारी आणि वन मंत्र्यांना विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला आहे.