मुंबई : भारतात क्रूझ पर्यटनाला चालना मिळावी सोबतच जलमार्गाचा वापर अधिकाधिक व्हावा आणि यातून लाखोंना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी मुंबईत पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्गांचं सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. येत्या काळात भारताला क्रूझ हब म्हणून ओळख निर्माण करुन देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. 


यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे आणि मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्गाची उपस्थिती होती. केंद्र सरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि फिक्कीकडून या क्रूझ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीजवळील लाईट हाऊसचे देखील ऑनलाईन अनावरण करण्यात आले. 


यावेळी माध्यमांशी बोलताना सोनोवाल म्हणाले की, "भारतात समुद्री पर्यटन आणि रिव्हर पर्यटनाला चालना देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्यात देश आणि परदेशातून वेगवेगळे प्लेयर इथे आले आहेत. केंद्राकडून क्रूझ पर्यटनाला चालना मिळावी यासाठी एका टास्कफोर्सची स्थापना देखील करण्यात आली आहे. ज्यात जलमार्गातून होणाऱ्या पर्यटनाला चालना देण्याचा आणि सागरी मार्गातील आपली शक्तीचा वापर कसा करायचा यावर खलबतं होत आहेत."


भारतीय आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेत देखील क्रूझ पर्यटनाबद्दल चर्चा होईल आणि या उद्योगाला चालना मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करु, असा विश्वास सोनोवाल यांनी व्यक्त केला. देशातील वेगळ्या प्रांतातील पर्यटन मंत्री आणि अधिकारी वर्गाची या क्रूझ परिषदेला उपस्थिती बघायला मिळाली. 


भारत सरकारकडून टास्क फोर्स आणि पोर्ट, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाकडून देखील चालना मिळवी म्हणून मदत करतील, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी केले. ज्यात अधिकारी आणि क्रूझ पर्यटनातील कंपन्यांचा देखील समावेश करणार असून खासगी कंपन्या देखील आपल्या सूचना देऊ शकतील. 


केंद्र सरकारचा क्रूझ पर्यटनातून मोठ्या प्रमाणात रोजगार तयार व्हावा हा उद्देश आहे. सोबतच जलशक्तीचा आणि जलमार्गाचा वापर अधिक व्हावा यासाठी प्रयत्नात मोदी सरकारच्या पहिल्या टर्मपासून होत असल्याचं बघायला मिळत आहे. 


जलमार्ग आणि क्रूझ पर्यटनात आधुनिकीकरण करण्याचा देखील केंद्राचा विचार आहे. यासंदर्भात केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्गमंत्रालयाकडून देखील पुढाकार घेण्यात येणार आहे.


"कोविडमुळे यात व्यत्यय आला होता, मात्र आता पुन्हा क्रूझ पर्यटन सुरु होईल ज्यामुळे रोजगार मिळण्यास आणि पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल," असं देखील केंद्रीय मंत्री सोनोवाल म्हणाले. 


येत्या काही दिवसात या क्षेत्राला एका उंचीवर नेण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असा विश्वास केंद्रीय मंत्री सर्बानंदसोनोवाल यांनी व्यक्त केला.