मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायव्यवस्थेवरील टीका आता भोवणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण इंडियन बार असोसिएशनने संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेत संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे. किरीट सोमय्या यांच्यासह भाजप नेत्यांना कोर्टात झुकतं माप दिलं जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. हा आरोप चुकीचा असल्याचा दावा या याचिकेतून केला जात आहे.


राज्यात भाजप नेत्यांचा दिलासा घोटाळा सुरु आहे. एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून संरक्षण आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. शिवाय शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातूनही यावर भाष्य करण्यात आलं होतं. पण 'सामना'तून न्यायव्यवस्थेवर टीका होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही 'सामना'तून रोखठोकपणे न्यायव्यवस्थेला खडेबोल सुनावण्यात आले होते किंवा त्यावर टीका-टिप्पणी करण्यात आली होती. परंतु माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अशी प्रतिक्रिया दिली होती की, "भाजप नेत्यांना कोर्टात झुकतं माप दिलं जात आहे किंवा त्यांना दिलासा दिला जात आहे. मात्र न्यायालयाची तीच भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल विशेषत: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांच्या बाबतीत दिसून येत नाही." संजय राऊत यांचा रोख नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या बाबतीत होता.


मात्र अशाप्रकारणे खुलेपणाने न्यायव्यवस्थेवर टीका-टिप्पणी करणं योग्य नाही. खासदार म्हणून त्यांच्याकडे जबाबदारीचं पद असताना त्यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेवर बोलताना सांभाळून बोलावं, अशा पद्धतीची ही याचिका आहे. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी कोर्टाचा अवमान केला आहे. इंडियन बार असोसिएशनच्या वतीने अॅड. अग्रवाल यांनी हायकोर्टात अवमान याचिका दाखल आहे. याचिकेत सामनाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सुद्धा प्रतिवादी करण्यात आलं आहे. या सर्वांना नोटीस बजावून त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. आता ही याचिका सुनावणीसाठी आल्यानंतर कोर्ट याकडे कशापद्धतीने बघतं आणि काही स्पष्टीकरण मागवतं का हे सुनावणीनंतर स्पष्ट होईल.


महाविकास आघाडी नेत्यांचे न्यायव्यवस्थेवर सवाल
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना कथित आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. न्यायव्यवस्थेमध्ये एका विशिष्ट विचारांचे लोक आहेत हे स्पष्ट दिसत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून संरक्षण आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या याच सूरात सूर मिसळत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही न्यायव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. अटकेपासून केवळ भाजपच्या नेत्यांना संरक्षण कसं मिळतं असा सवाल त्यांनी विचारला.