कल्याण : कल्याण-डोंबिवलीमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांची आकडेवारी लक्षणीयरित्या वाढत आहे. तर दुसरीकडे उड्डाणपूलावरुनही चांगलच राजकारण रंगलेले पाहायला मिळत आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेल्या वडवली उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही केवळ मंत्री व लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याने उदघाटन लांबल्याचा आरोप मनसे करत शासकीय कार्यक्रमापूर्वीच आज या पुलाचे उदघाटन केले. 

Continues below advertisement

मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत हे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. मात्र या आंदोलनामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

कल्याणच्या वडवली आणि आंबिवली भागांना जोडणाऱ्या या रेल्वेफाटकावरील उड्डाणपुलाचे गेल्या 11 वर्षांपासून काम सुरू होते. अनेक तांत्रिक अडचणींना तोंड दिल्यानंतर आता कुठे हा पूल पूर्णत्वास आला आहे. त्याचे या आठवड्यात उद्घाटन होणे अपेक्षित असताना काही कारणास्तव हा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेने आज संध्याकाळी गनिमीकावा करत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. 

Continues below advertisement

याठिकाणी लावलेले पत्रे मनसैनिकांनी बाजूला करत दोन्ही दिशेची वाहतूक सुरू केली. गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या लोकांना यायला जायला त्रास होत आहे. मात्र तरीही मान्यवरांना वेळ नसल्याने या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले जात नव्हते. म्हणून आम्ही हा पूल लोकांसाठी वाहतुकीला खुला केल्याच मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं.