मुंबई : मुंबई दहशतवाद विरोधी पथकाकडून एका बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कॉल सेंटरचा दहशतवादी संघटनाशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे.


मुंबईत एटीएसने एकूण सहा ठिकाणी धाडी टाकल्या असून 7 जणांना अटक केली आहे. तर साडे सहा लाखांचा माल जप्त केला आहे. या रॅकेटमधून घातपाती कृत्य होण्यासाठी संपर्क केल्याची सूत्रांची माहिती एटीएसला मिळाली होती. तसेच या रॅकेटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय कॉल करून ते इतर राज्यात वळवण्यात येत होते. त्यामुळे अतिरेकी कारवायांसाठी या टेलिफोन एक्सचेंज रॅकेटचा वापर केला जात तर नाही ना? याचा तपास सध्या एटीएस करत आहे.

9 ऑगस्ट रोजी मुंबई एटीएसला माहिती मिळाली होती की, भारतात बेकायदेशीर कॉल रॅकेट सुरू आहे. या माहितीनंतर वरळी, पनवेल, शिवाजीनगर ( गोवंडी), डोंगरी, मशीद बंदर, कल्याण येथे धाडी टाकून 7 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 3 लॅपटॉप, 7 राउटर, 2 सर्व्हरॉ ,11 मोबाईल फोन असा साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. तर
37 कोटींचा व्यवहार बेकायदेशीर व्यवहार झाला असल्याची माहिती आहे.

या कारवाईत 513 सिमकार्ड्स मिळाली आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात सिमकार्ड मिळाल्याने देशविरोधी कृत्य होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या ठिकाणांहून कतार, कुवेत या आखाती देशातून कॉल दुसरीकडे वळवण्यात येत होते. त्यामुळे दहशतवादी संघटनांशी यांचा संबंध असल्याचा संशय असल्याने त्या दिशेने तपास सुरू आहे.