मुंबई : सांगली, कोल्हापुरात महापुरानं थैमान घातलं आहे. अशाही परिस्थितीत भाजपकडून चमकोगिरी करत जाहिरातबाजी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. स्टिकर्स लागले नव्हते, म्हणून मदतीसाठी उशीर झाल्याची टीका आव्हाडांनी भाजप सरकारवर केली.


जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत म्हटलं की, "सरकारला मदत द्यायला उशीर झाला, रागावू नका, स्टिकर्सच्या डिझाईन प्रिटिंगला उशीर लागला. म्हणून मदतीला उशीर झाला. आता अत्यसंस्कार थोडे थांबून करा, कारण तिरड्यांवरचे स्टिकर्स तयार नाहीत." आमदार प्रत्येक तिरडीला खांदा देणार असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.





भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह स्वतःचा फोटो असलेले स्टिकर मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याच्या पाकिटावर लावले. पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मुदतीमध्ये देखील भाजप सरकार चमकोगिरी करत जाहिरातबाजी करत असल्याने सर्वच स्थरावरून संताप व्यक्त केला जात आहे.



मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे, असे म्हटले आहे. सरकारच्या पैशांवर अशा प्रकारे जाहिरातबाजी करणे योग्य नाही. जनता ह्या लोकांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे. तर सरकार प्रसिद्धीसाठी वाटेल ते पाऊल उचलत आहे. हे चमकोगिरी करत आहेत. कार्यकर्त्यांना छुप्या पद्धतीने हे स्टिकर लावायला सांगितले असतील, असा आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.



फोटो हटवणार, सुरेश हाळवणकर यांची दिलगिरी
पूर परिस्थिती ओसरल्यानंतर मदतीसंदर्भात शासन निर्णय आल्यानंतर तातडीने बैठक घेऊन आम्ही धान्याची मदतीसाठी आम्ही पैकेट्स तयार केलरर. रेशन दुकानदारांनी हे फोटो लावले. ही मदत शासनाची आहे. रेशन दुकानदारांच्या कमिटीला मी बोललो आहे. महाराष्ट्र शासन लिहिणे अपेक्षित आहे. मात्र रेशन दुकानदारानी हे फोटो लावले. आता ते स्टिकर काढण्याबाबत सांगितले जाईल, असे स्पष्टीकरण आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिले आहे. तसेच त्यांनी या प्रकारावर दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.