मुंबई : "इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी वेळ पडलीच तर राज्य गहाण ठेवू," असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ठाण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते. तसंच गीता, बायबल आणि कुराणपेक्षा आम्हाला संविधान प्रिय आहे, असंही ते म्हणाले.


मुख्यमंत्री म्हणाले की, "रोज वाद करायला अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत. पण मी हात जोडून विनंती करतो, बाबासाहेबांवर वाद करु नका. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी हे राज्य गहाण ठेवायला मी कमी करणार नाही. कारण बाबासाहेबांमुळे आज राज्याची ही स्थिती आहे. त्यांच्यामुळे हे राज्य पुरोगामी बनलंय."

स्मारकाच्या आराखड्यात बदल नाही
बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची कमी शंभर फुटांनी कमी केल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. मात्र हे आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळले. "बाबासाहेब आभाळाएवढे उंच आहेत, कोणताही पुतळा त्यांची उंची मोजू शकत नाही. पण त्याच वेळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्यावेळी याचा आराखडा तयार केला आमचे सामाजिक न्यायमंत्री बडोले यांना सांगितलं होतं की बाबासाहेब यांचं स्मारक तयार करायचं आहे. सर्वांचं एकमत करुन घ्या. त्यांना भेटून आराखडा दाखवा, सगळ्यांच्या सह्या त्याच्यावर घ्या. रामदास आठवलेंसह सगळे नेते आम्ही एकत्र केले, आठवलेजींनी सगळ्यांना आराखडा दाखवला. सगळ्यांनी मान्य केलं. मग त्यावर सह्या झाल्या. तयार आराखड्यामुळे तसूभरही बदल केलेला नाही."

गीता, बायबल आणि कुराणपेक्षा संविधान प्रिय
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान हे इतकं मजबूत आहे, ते कोणीही मोडू शकत नाही, तोडू शकत नाही, बदलू शकत नाही, ते कधीही बदलू शकत नाही. लोकांना खोटं सांगण्याची आवश्यकता नाही, आम्हाला हे संविधान गीता, बायबल आणि कुराणपेक्षा प्रिय आहे. याचं कारण या संविधानामुळे आमचं अस्तित्त्व आहे. या संविधानामुळे वंचितांना न्याय आहे. या संविधानामुळे राजकीय व्यवस्था आहे. या संविधानामुळे भारत पुढे पुढे जात आहे. संविधानामुळे जगात भारताची ओळख आहे. त्यामुळे हे संविधान कधीच कोणीही बदलू शकत नाही," असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

रिपाइंच्या वर्धापन दिनामधील मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण भाषण