मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाता गुंता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता विविध नेत्यांनी उडी घेतल्याने या प्रकरणाला राजकीय रंगही चढले आहेत. त्याचत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशात सिंह मृत्यूच्या तपासावरुन टीका केली आहे. मुंबईने माणुसकी गमावली असून निरपराध आणि स्वाभिमानी लोकांसाठी राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नसल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे.


सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेले पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वॉरन्टाईन केलं. त्यावर बरीच चर्चा सुरु आहे. शिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेते राम कदम, किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तपास यंत्रणेवर टीका केली. त्यातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही वक्तव्य करुन या प्रकरणात उडी घेतली आहे.


अमृता फडणवीस यांनी लिहिलं आहे की, "ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळलं जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही. "





अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. मात्र त्याच वेळी त्या कायमच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. त्यांच्या या ट्वीटवर काहींनी हा मुद्दा उपस्थित केल्याने त्यांचं समर्थन केलं आहे. तर काहींनी मुंबई एवढीच असुरक्षित वाटत असेल तर नागपूरला जा, असा सल्लाही दिला आहे.


वरुण सरदेसाई यांचा अमृता फडणवीसांवर निशाणा


दरम्यान युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. "मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर," असं त्यांनी लिहिलं आहे.