मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणूक काळात राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर राजकीय मंचांवर भाष्य केले, मला त्यातले सगळे मुद्दे वाखणण्याजोगे वाटले त्यामुळे मी राज यांना भेटले आणि निवडणुकीत त्यांचा पाठिंबादेखील घेतला, अशी माहिती बॉलिवूड अभिनेत्री आणि नुकत्याच राजकारणात सक्रीय झालेल्या उर्मिला मातोंडकर यांनी दिली. मातोंडकर आज (शनिवार) एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी अनेक राजकीय गोष्टींवर भाष्य केले.


उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर मुंबई मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढली आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात मातोंडकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या दादर येथील निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी उर्मिला यांना पाठिंबादेखील जाहीर केला होता.

राज ठाकरे यांच्या भेटीबाबत आणि त्यांच्या पाठिंब्याबाबत मातोंडकर म्हणाल्या की, निवडणूक काळात राज ठाकरे यांनी जी भाषणं केली. त्या भाषणांमध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष आणि निवडणुकीला बाजूला ठेवून विविध मुद्दे लोकांसमोर मांडले, ते मुद्दे ऐकून मला असं वाटलं की, आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीने या मुद्द्यांवर भाष्य का केले नाही? कोणीच यावर का बोलत नाही? परंतु राज सातत्याने सरकारच्या चुकांवर आणि एकंदरीत लोकांसाठी बोलत होते.

उर्मिला म्हणाल्या की, देशाच्या दृष्टीने राज यांना ज्या गोष्टी चुकीच्या वाटल्या त्यावर ते बोलत राहीले, लोकांसमोर नवनवीन मुद्दे मांडत राहीले, त्या गोष्टी मला वाखण्याजोग्या वाटल्या त्यामुळे मी त्यांना भेटले आणि त्यांच्या पाठिंबादेखील घेतला. राज यांनी मला पाठिंबा दिल्याचा मला खूप फायदादेखील झाला, प्रचारादरम्यान महाराष्ट्र नविर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मला खूप मदतदेखील केली.

व्हिडीओ पाहा



राज यांच्याविषयी अधिक बोलताना उर्मिला म्हणाल्या की, मी आणि राज ठाकरे एकमेकांना खूप पूर्वीपासून ओळखतो. राज नेता होण्याआधी आणि मी अभिनेत्री होण्याआधीपासून आमची ओळख आहे. आम्ही रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत. राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनादेखील मी तेव्हापासूनच ओळखते.

वाचा : ...म्हणून मला वाटतं मी चुकीच्या क्षेत्रात आले आहे : उर्मिला मातोंडकर