मुंबईः मुंबई अग्निशमन दलाच्या जीवघेण्या भरती प्रक्रियेची दखल राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली आहे. आयोगाने सू मोटो दाखल करून घेत मुंबई महापालिकेला नोटीस बजावली आहे. महापालिका आयुक्तांना 28 ऑक्टोबरपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


 

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागात 774 फायरमन पदांसाठी भरती प्रक्रिया चालू आहे. मात्र या भरतीचे निकष चांगलेच वादात सापडले आहेत. मैदानी चाचणीत उमेदवारांना 19 फुटांवरुन उडी मारण्याच्या अटीमुळे अनेक उमेदवार जखमी झाले आहेत.

 

भरती प्रक्रियेदरम्यान 200 पेक्षा अधिक उमेदवार जखमी झाले आहेत. काहींचे हाड तुटले आहेत, तर काहींच्या पायांना जखम झाली आहे. याची मानवी हक्क आयोगाने दखल घेत सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. दरम्यान या जखमी झालेल्या उमेदवारांचा वैद्यकीय खर्च कोण उचलणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.