कर्जमाफीसाठी आतापर्यंत किती ऑनलाईन अर्ज? सरकारकडून आकडेवारी जाहीर
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2017 08:00 PM (IST)
10 लाख 11 हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
मुंबई : सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन भरण्याची प्रकिया 24 जुलै 2017 पासून सुरू झाली आहे. 16 ऑगस्ट 2017 पर्यंत 12 लाख 38 हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून 10 लाख 11 हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. “छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 च्या कर्जमाफीसाठी राज्यामध्ये एकूण 26 हजार केंद्रावर अर्ज भरण्यात येत आहेत. त्यात आपले सरकार केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम केंद्र आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या केंद्राचा समावेश आहे.”, अशी माहीती देशमुखांनी दिली. त्याचसोबत, “अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरून होईपर्यत ही केंद्र सुरू राहणार आहेत. मागच्या आठवड्यापासून जवळपास रोज एक ते सव्वालाख शेतकऱ्यांची नोंदणी होत आहे.” असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.