मुंबई : "काही लोक दलबदलू असतात. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे कोणी गेलं तर नवीन लोकांना संधी मिळेल", अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नारायण राणेंबाबतच्या प्रश्नावर दिली.


नारायण राणेंची भाजप प्रवेशाबाबतची चर्चा आणि काँग्रेसला लागलेली गळती याबाबत अशोक चव्हाण यांना विचारण्यात आलं. त्यावर चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली.

अशोक चव्हाण म्हणाले, “पक्षातून कोणी गेलं तर, कोणी नवीन नेतृत्व उभं राहतं. काही लोक दलबदलू आहेत. काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे कोणी गेलं तर नवीन लोकांना संधी मिळेल”.

भाजप मोठा खरेदी विक्री संघ

भाजप देशातील मोठा खरेदी विक्री संघ आहे, करलो दुनिया मुटठी में असं भाजपचं सुरु आहे. कोणी उपयुक्त आहे की नाही हे न पाहता प्रवेश देणं सुरू आहे. यामुळे काँग्रेसला फार नुकसान होणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर अनेक लोक जातात-येतात, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

बैलगाडी शर्यत

मराठा आरक्षण ते बैलगाडा शर्यत याबाबत राज्य सरकार न्यायालयीन बाबीत कमी पडत आहे. तामिळनाडूमध्ये जलीकट्टूला परवानगी मिळू शकते, तर महाराष्ट्रात बैलगाडीला का नाही? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला.

मुंबई विद्यापीठ

“मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांची पात्रता होती का? देशमुख हे संघाशी निगडीत असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीशी संबंधित होते. आज विद्यार्थ्यांचे भविष्य वेठीस धरलं जात आहे. परदेशात प्रवेश घ्यायचे आहेत. मात्र तारीख पे तारीख सुरु आहे.

प्रकरण गंभीर होत चाललं आहे. कुलगुरुंना काढून टाकून त्यांच्या जागी नवी नियुक्ती करा”, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

 रोहित वेमुला प्रकरणाबाबत

यावेळी अशोक चव्हाण यांनी रोहित वेमुला प्रकरणाबाबतही प्रतिक्रिया दिली.

 या प्रकरणात चौकशीतून काही निष्पन्न होईल असं वाटलं नव्हतं. रोहित वेमुलाला आत्महत्या करण्यासाठी असं कोणतं व्यक्तिगत कारण होतं? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. रोहित वेमुला या विद्यार्थ्यावर अन्याय झाला, त्याला न्याय देण्याऐवजी इतरांना वाचवलं जात आहे, असं चव्हाण म्हणाले.