मुंबई : मुंबई महापालिकेत आपलाच महापौर बसावा यासाठी अनेक पर्याय आणि आकड्यांची जुळवाजुळव करण्याच्या हालचाली पडद्यामागे सुरु आहेत. यासाठी फोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.


मात्र 1992 ते 1997 या कालावधीत जेव्हा मुंबई महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस फोडाफोडीचं राजकारण करून शिवसेनेने आपला महापौर बसवला होता. शिवसेना नेते मनोहर जोशी आणि राज ठाकरे हे या फोडाफोडीच्या राजकारणाचे मुख्य सूत्रधार होते आणि त्यांनी ही जबादारी यशस्वीरित्या पार पाडली होती.

कुठल्याही पक्षाचे एक तृतीयांश नगरसेवक फोडले तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार संबंधित पक्ष नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करु शकत नाही. त्यावेळेस बहुमताचा आकडा काँग्रेसकडे होता. मात्र अर्ध्याहून अधिक नगरसेवकांना फोडून त्यांना राजीनामे देण्यास शिवसेनेनं भाग पाडलं.

काँग्रेसचे नगरसेवक विजय लोके यांच्या माध्यमातून काँग्रेसचे नगरसेवक फोडण्यात आले आणि फक्त 20 ते 25 नगरसेवकांची संख्या काँग्रेसकडे उरली. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा हा परिणाम होता. मुरली देवरा आणि गुरुदास कामत यांनीही शिवसेनेला मदत केली होती.

एका रात्रीत मनोहर जोशी यांनी त्यांचे निकटवर्तीय असलेले नगरसेवक मिलिंद वैद्य यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना महापौरपदी विराजमान केलं होतं. मिलिंद वैद्य हे सर्वात तरुण महापौर झाले होते आणि तेव्हापासून आजतागयत मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसला आहे.

महत्त्वाचं म्हणजे आज उद्धव ठाकरे यांनी बंद दारवाजाआड सुमारे दोन तास मनोहर जोशी आणि लीलाधर डाके यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे मागच्या संदर्भांची उजळणी आणि भविष्यात त्याचा वापर कसा करता येईल याबाबाबत उद्धव यांनी या दोन ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेतल्याचे कळते.

कोणत्याही संकटसमयी घरच्या जुन्या जणत्यांचे मत घेऊनच पुढची वाटचाल करावी अशी एक सर्वसाधारण समजूत आपल्याकडे असते. बहुदा उद्धव ठाकरे याच दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसतं.

त्यावेळचं संख्याबळ:

काँग्रेस 112
शिवसेना 69
भाजप 14
मुस्लिम लीग 5
माकप 2
कामगार आघाडी 1
जनता दल 8
अपक्ष 9