मुंबई : काल रात्री पासून मुंबईसह उपनगरात होणाऱ्या जोरदार पावसाचा परिणाम थेट मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेवरील भांडुप, कांजुरमार्ग आणि विक्रोळी दरम्यान पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर हार्बर मार्गही पूर्णपणे बंद झाला आहे. पश्चिम रेल्वे मात्र वसई-विरार वाहतूक ठप्प झाली आहे.


येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  हवामान विभागाकडून सकाळी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र काही काळाने तो वाढवून आता रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाबेर पडण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

Mumbai Rains | मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस, अधेरी सबवे भागात पाणी साचलं | ABP Majha



लोकल वाहतूक ठप्प

मध्य रेल्वे

दुसरीकडे भांडुप, कांजुरमार्ग आणि विक्रोळी दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ठाणे ते सीएसएमटी दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सीएसएमटीकडे जाणारी धीम्या आणि जलद दोन्ही मार्गावरील वाहतूक थांबवली आहे.

पश्चिम रेल्वे

गेल्या 8 तासांत वसई-विरार भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. मुसळधार पावसाचा परिणाम थेट रेल्वे वाहतुकीवर पाहायला मिळतो आहे. नालासोपाराला रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे विरार-वसई  रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्याही विरार रेल्वेस्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. विरारहून डहाणूच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.

हार्बर मार्ग

मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील वाशी-सीएसटी मार्गावरील रेल्वेवाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

कोकण

मुसळधार पावसामुळे कोकणात जाणारी रेल्वे वाहतूकही थांबवण्यात आली आहे. नागोठण्यादरम्यान रेल्वे ट्रॅकवर माती आल्याने कोकणात जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांना हाल सहन करावे लागतं आहे.

Konkan Railway | कोकणातील रेल्वे वाहतूक ठप्प, करंजाडी रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बंद | ABP Majha