मुंबई : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगरात सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र यंदाच्या मान्सूनमधील पहिल्याच मोठ्या पावसाचा परिणाम मुंबईकरांच्या लाईफलाईनवर झाला आहे. लोकल ट्रेन 10 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत.


मध्य रेल्वेवरील जलद वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने तर धीम्या मार्गावरील वाहतूकही 10 ते 15 मिनिटं उशिराने ससुरु आहे. सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक 20 आणि धीमी वाहतू 15 मिनिटं उशिराने सुरु आहे. हार्बर मार्गावर मार्गावरील गाड्याही 10 ते 15 मिनिटं विलंबाने धावत आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेन 10 मिनिटं उशिराने सुरु आहेत.

मालगाडीच्या इंजिनात बिघाड
आधीच पावसामुळे गाड्या विलंबाने सुरु आहेत, त्यातच आता आसनगाव आणि खर्डी स्टेशनदरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा रखडली आहे. कल्याण-कसारा रेल्वेसेवा अर्ध्या तासांपेक्षा जास्त उशिराने सुरु आहे.

स्थानकांवर पाणी भरण्यास सुरुवात
ठाणे स्टेशनवर पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. ठाकुर्ली स्टेशनवरही काल रात्रीपासून पाणी साचलं आहे. पाऊस सतत सुरु राहिल्यास आणखी बऱ्याच स्थानकांवर पाणी भरण्याची शक्यता आहे.

रस्ते वाहतुकीवरही परिणाम
तर दुसरीकडे या मुसळधार पावसाचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम झालेला दिसतो. काही ठिकाणी पाणी भरल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. पश्चिम द्रूतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, आज दिवसभर मुसळधार पाऊस बरसेल, असा इसारा स्कायमेटने दिला आहे.