डोंबिवली : केंद्र सरकारने बँकेसह सर्व कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. सर्वांना आपल्या बँक खात्याशी 31 मार्च 2018 पर्यंत आधार लिंक करायचं आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्यांच्यासाठी बँकांमध्येच आधार नोंदणी केंद्र सुरु करण्यात आलं आहे. मात्र यासाठी भीषण गर्दी पाहायला मिळत आहे.


नोटाबंदी झाल्यानंतर एटीएमच्या बाहेर जशा रांगा लागायच्या तशीच रांग डोंबिवलीच्या आधार नोंदणी केंद्रावर लागलीय. रांगेत कुणी पुढे गेला की भांडणंही ठरलेली आहेत. डोंबिवली पूर्वेच्या देना बँकेत सध्या एकमेव आधार केंद्र सुरू आहे. इथली गर्दी इतकी, की लोक नंबर लावण्यासाठी अंथरूण पांघरून घेऊन इथे झोपायलाच येतात.

दिवसाला फक्त 25 फॉर्म घेतले जातात. लहान मुलं असोत की म्हातारी माणसं... लोकांना 12-12 तास रांगेत उभं राहावं लागतंय. खासगी केद्रांवर गेलं तर याच फुकट मिळणाऱ्या आधार कार्डसाठी 300 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे आधार कार्डने डोंबिवलीकरांची झोप उडवलीय.

कामाधंद्याचा खाडा करून लोकांना ताटकळत उभं राहावं लागतंय. त्यानंतरही आपला नंबर येईलच याची शाश्वती नाही. त्यामुळे या आधार कार्डाने एकूणच नागरिकांच्या नाकात दम आणलाय. त्यामुळे बँकांमध्ये आणि इतर ठिकाणीही आधार प्राधिकरणाकडून नोंदणी केंद्रांची संख्या वाढवण्याची गरज आहे.