मुंबई : भारतातील सट्टा बाजारातील मोठे नाव असलेला बुकी सोनू जालान उर्फ सोनू मालाड याला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बऱ्याच कालावधीपासून त्याचा जामीन अर्ज हायकोर्टात प्रलंबित होता. अखेरीस न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी सोनूला जामीन मंजूर केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्त्वाखाली ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने सोनू जालानला 19 मे 2018 रोजी अटक केली होती.


'अल जझीरा' या परदेशी वृत्तवाहिनीने केलेल्या कथित स्टिंग ऑपरेशनद्वारे भारताने काही कसोटी सामने फिक्स केल्याचा दावा केला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटक्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर सोनू जालानला अटक झाली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोनू जालान हा मुंबईच्या सट्टा बाजारातील मोठा सट्टेबाज असून त्याचे परदेशातही अनेक ग्राहक आहेत. यापैकी अफगाणिस्तान, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका आणि सौदी अरेबिया या ठिकाणच्या ग्राहकांशी तो सतत संपर्कात असतो. तर भारतात त्याची मोठी टोळी असून ते दिल्ली, कोलकाता, राजस्थान, गुजरात, हरयाणा येथून त्याचे पंटर्स सट्टा खेळतात.

सोनू जालान हा कांदिवली येथील अग्रवाल रेसिडन्सी येथे राहत असून त्याला मुंबई पोलिसांनी अनेकदा क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

काय होतं फिक्सिंगचं प्रकरण
भारताने 2016-17 या कालावधीत मायदेशात आणि परदेशात खेळलेल्या कसोटी सामन्यांपैकी एकूण 3 कसोटी सामने हे फिक्स असल्याचा दावा अल जझीरा या वृत्तवाहिनीने केला होता. त्यावर बीसीसीआयने याबाबत आधीच चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले होते. यासंदर्भात प्रथम श्रेणीतील क्रिकेटपटू रॉबिन मॉरिसचं नाव पुढे आलं होतं.