मुंबई : अनेक दिवसांपासून वादात अडकलेल्या गोरेगावच्या मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. मोतीलाल नगरचा पुनर्विकास आता म्हाडाच्या माध्यमातून केला जाणार आहे. विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.


काय आहेत मोतीलाल नगर पुनर्विकासाची वैशिष्ट्ये?



  • मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास केल्यावर पुनर्वसन घटकाव्यतिरिक्त साधारणपणे 33,000 गाळे सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होवू शकतील. त्यामुळे यास “विशेष प्रकल्पाचा दर्जा” देण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • म्हाडाच्या गोरेगाव (प.) येथील मोतीलाल नगर 1, 2 व 3 येथे सुमारे 50 हेक्टर ऐवढ्या जागेवर गाळ्यांची अंदाजीत संख्या 3700 व झोपड्यांची संख्या अंदाजे 1600 अशी एकत्रित 5300 इतकी आहे.

  • सर्वसामान्यांसाठी 33 हजार गाळे उपलब्ध होणार

  • या प्रकल्पांतर्गत निवासी वापराकरीता प्रतीगाळा 1600 चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळ (BUA) मंजूर करण्यात येईल

  • मात्र, या 1600 चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापैकी विनियम 33(5) च्या तरतुदींनुसार अनुज्ञेय असलेल्या 833.80 चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळासाठी येणारा बांधकाम खर्च या पुनर्विकास प्रकल्पासाठीच्या एजन्सीला करावा लागेल.

  • अनिवासी वापराकरीता प्रतीगाळा 987 चौ.फु. इतके बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करण्यात येईल या 987 चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापैकी वि.नि.व प्रो.नि. 2034 मधील विनियम 33(5) च्या तरतुदींनुसार अनुज्ञेय असलेल्या 502.83 चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळासाठी येणारा बांधकाम खर्च या पुनर्विकास प्रकल्पासाठीच्या संस्थेने करावा.


ही नेमणूक करताना चटई क्षेत्र निर्देशांकाची हिस्सा विभागणी तत्वानुसार करण्यात यावी व त्यासाठी आवश्यक ती निविदा प्रक्रिया म्हाडामार्फत राबविण्यात येईल. या प्रकल्पासाठी निविदा अंतिम करताना पुनर्वसन हिस्सा वगळून उर्वरित शिल्लक चटई क्षेत्रफळापैकी जास्तीत जास्त हिस्सा म्हाडास उपलब्ध करुन देणाऱ्या एजन्सीची निविदा अंतिम करण्यात येईल. मात्र, निविदेतील देकारानुसार म्हाडास मिळणारे बांधिव क्षेत्रामध्ये सवलत देणे अथवा त्याऐवजी अधिमूल्याचा पर्याय स्विकारला असल्यास अधिमूल्यामध्ये सवलत देण्याबाबत नेमकी स्थिती याबाबत निविदा अंतिम करण्यापूर्वी शासनाची पूर्वमान्यता घेण्यात येईल.


उच्च न्यायालयाच्या दि.17.10.2013 रोजीच्या आदेशानुसार हा प्रकल्प म्हाडा स्वत: पूर्ण करणार आहे. तथापि, म्हाडाला हा प्रकल्प राबविणे सद्यपरिस्थितीत शक्य नसल्याने एजन्सीची नियुक्ती करुन अप्रत्यक्षपणे म्हाडाला प्रकल्प राबवावा लागणार आहे. त्याकरिता काही अटींसह म्हाडातर्फे कच्ची पूर्व तयारी म्हणून करण्याकरिता पावले उचलली जाणार आहेत. त्यासाठी देखील आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.


मोतीलाल नगर वसलेल्या जागेचे एकूण क्षेत्रफळ लक्षात घेता, गाळ्यांची घनता 106 गाळे प्रति हेक्टर आहे. ही घनता बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 च्या विनियम 30 (बी) नुसार 450 गाळे प्रति हेक्टरपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तेथे पुनर्विकासास मुबलक जागा उपलब्ध आहे. शिवाय, सध्या तेथे अस्तित्वात असलेल्या रहिवाशांना त्यांनी धारण केलेल्या गाळ्यांच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त मोकळी जागा वापरण्यास उपलब्ध असल्याची माहिती म्हाडाच्या वतीने देण्यात आली आहे. 


याआधी म्हाडाच्या पुर्नविकासाला स्थानिक रहिवाश्यांनी विरोध केला होता. बाजूला असलेला सिद्धार्थ नगरचा प्रोजेक्ट ज्या प्रकारे रखडला आहे. तसा रखडू नये यासाठी आम्हीच याचा पुर्णविकास करणार असल्याची भूमिका स्थानिक रहिवासी यांनी घेतली होती. मात्र आता बीडीडी चाळ, पत्रा चाळ आणि त्यानंतर मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागताना पाहायला मिळतोय.