आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव सरकारनं फेटाळला
एबीपी माझा वेब टीम | 02 Nov 2016 06:13 PM (IST)
मुंबई: नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव राज्य सरकारनं फेटाळला आहे. तसेच नवी मुंबई प्रशासनला बाजू मांडण्यासाठी सरकारनं ३० दिवसांचा वेळ दिला आहे. त्यामुळे मुढेंची गच्छंती होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. तुकाराम मुंढेंविरोधातला अविश्वास ठराव फेटाळून मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार दणका दिला आहे. तसेच स्वच्छ प्रतिमेच्या आयुक्तांची पाठराखण केल्याचं स्पष्ट झालं आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अविश्वास ठरावावर कायदेशीर प्रक्रिया होईल. असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर आज हा अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. आपण केलेली कारवाई योग्य असल्याचं म्हणणं मुंढेंचं आहे. त्यामुळे या संपू्र्ण प्रकरणाबाबत सरकारनं नवी मुंबई प्रशासनाला 30 दिवसांचा वेळ दिला आहे. 'अविश्वास ठराव फेटाळणं ही राजकीय खेळी' कुठल्या कायद्याच्या आधारे हा ठराव फेटाळण्यात आला आहे. हे अद्याप माझ्याकडे आलेलं नाही. पण हा ठराव सभागृहाच्या पाच अठमांश लोकांना पारित केला आहे. त्यामुळे हा ठराव राजकीयदृष्ट्या फेटाळण्यात आला आहे. असा आरोप नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणेंनी केला आहे. 'मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला आहे.' 'जर सरकारला कायदा मानायचं नसेल तर त्यांनी कायदा बदलावा असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आधीच सांगितलं आहे. अविश्वास ठराव फेटाळणं ही राजकीय खेळी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आमचा विश्वासघात केला आहे. मुख्यमंत्री हे कायद्याला बगल देत आहेत.' असा आरोप नवी मुंबईचे सभापती आणि शिवसेना नेते शिवराम पाटील यांनी केला आहे. तुकाराम मुंढेंवर भाजप वगळता सर्व नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणला होता. तसेच मुंढेंची तातडीने बदली करण्याची मागणी केली होती. दरम्यान, तुकाराम मुंढेंनीही आपण इथे आहोत तोपर्यंत नेहमीप्रमाणेच काम करणार, असं यापूर्वीच सांगितलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, त्याकडे लक्ष लागलं आहे. संबंधित बातम्याः