मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. एवढंच नाही तर नार्वेकरांच्या घरातले उकडीचे मोदक राज्यपालांनी आवडीनं मागून घेतले. गणेशोत्सवात उकडीचे मोदक खाण्याची मजा काही औरच असते. राज्यपालांनाही नार्वेकरांच्या घरी आल्यावर रहावलं गेलं नाही गणरायाचे दर्शन घेऊन नार्वेकरांकडे “उकडीचे मोदक कुठे आहेत”? असा सवाल केला “मला उकडीचे मोदक खुप आवडतात” त्यानंतर चहा मोदक आणि राज्यपालांच्या गप्पा सुरु झाल्या. राज्यपाल कोश्यारीनी तब्बल 20 मिनिटं नार्वेकरांची घरी वेळ घालवला.


गणपती बाप्पा, कोरोनाची परिस्थिती आणि अध्यात्म या विषयावर चर्चा रंगल्या होत्या. यावेळी मिलिंद नार्वेकर यांची पत्नी मीरा नार्वेकर व इतर कुटुंबिय उपस्थित होते.

राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यातलं नातं काही वेगळं सांगण्याची गरज नाही, कधी परिक्षांवरून, विधानपरिषेदवरून, राज्यपाल नियुक्त सदस्यांवरून तर कधी बदल्यांवरून राज्यपाल आणि सरकार यांच्यात वाद पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यपाल आणि शिवसेना यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. सत्तास्थापनेचा दावा करण्यापासून ते सत्तास्थापन होईपर्यत राज्यपाल आणि शिवसेनेमध्ये अनेकवेळा जुंपली होती. त्यानंतर शिवसेना सचिव यांचे आणि राज्यपाल कोश्यारींची चांगलीच मैत्री जमली, याच मैत्री खातीर राज्यपाल भगतसिंग कौश्यारी हे नार्वेकर यांच्या घरी गणपती दर्शनाला आले होते. मिलिंद नार्वेकर यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो या दरम्यान अनेक राजकीय, बालिवूड स्टार, उद्योगपती दर्शनाला येत असतात. मागील काही वर्षात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नार्वेकर यांच्या घरी यायचे. भाजप आणि शिवसेनेला जोडणार एक समन्वयक म्हणून नार्वेकराकडे पाहिलं जात होतं.

 निधिवाटपात दुजाभाव होत असल्यानं काँग्रेसचे 11 आमदार उपोषणाला बसणार!

राज्यपाल नियुक्त सदस्यपद पुढे ढकलली

कोरोनाच्या संकटात पुढील काही महिने नियुक्त्यांबाबत कोणताही प्रस्ताव न पाठवण्याच्या सूचना राज्यपालांनी दिल्या होत्या. पण महाविकास आघाडी या प्रक्रियेसाठी लवकरच आग्रह धरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नियमांवर बोट ठेवत राज्यपाल नियुक्त सदस्य होण्यास नकार दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषद निवडणुका घेण्याची विनंती पत्राद्वारे केली होती. या विनंतीनुसार राज्यपालांनी केंद्राकडे निवडणुका घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानपरिषदचे बिनविरोध उमेदवार म्हणून विजयी झाले होते. विधीमंडळातल्या 12 जागा या महाविकासआघाडीसाठी महत्त्वाच्या आहेत. विधानपरिषदेचं संख्याबळ वाढतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्यपाल या नियुक्त्यांबाबत राजकारण करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आला आहे.

राज्यपालांचं वेट अॅण्ड वॉच

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी आपण ज्या सदस्यांची नियुक्ती करणार आहोत त्यांचे निकष काटेकोरपणे पालन करणार आहेत. तसेच यंदा कोरानाची परिस्थिती असल्यामुळे पुढील दोन महिने नावं पाठवू नका अशा सूचना दिल्याचंही कळतंय. त्यामुळे महाविकास आघाडीची चांगलीच पंचाईत होण्याची शक्यता आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मिलिंद नार्वेकरांच्या घरी! राज्यपालांनी घेतलं नार्वेकरांच्या गणपतीचं दर्शन