नवी दिल्ली : भारतात रेल्वे स्टेशन्सवरील गुगलकडून देण्यात येणारी मोफत वायफाय सेवा बंद होणार आहे. गुगलने त्या संदर्भात घोषणा केली आहे. भारतात आता स्वस्त दरात आणि वेगवान इंटरनेट उपलब्ध झालं आहे. त्यामुळे आमचा हेतू साध्य झाला असून आता हे इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र तरी देखील ही सेवा प्रवाशांना मिळणार आहे. मे 2020 मध्ये गुगलकडून ही सेवा बंद होणार आहे. मात्र तरी देखील ही सेवा सुरु राहील, असं रेलटेल कार्पोरेशनने सांगितलं आहे. गुगलची सेवा बंद झाल्यानंतर रेलटेल देशातील चारशेहून अधिक रेल्वेस्थानकांवर फ्री वायफाय देणार आहे.


गुगलने नुकतीच भारतातील रेल्वे स्टेशनवर देण्यात येणारी मोफत वायफायची सुविधा बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. देशामधील 400 हून अधिक स्टेशनवरून ही सेवा हळूहळू बंद करण्यात येणार आहे. मोफत वायफाय सेवा बंद होत असताना इंडियन रेल्वे आणि रेलटेल कॉर्पोरेशनबरोबर काम सुरू ठेवणार असल्याचे देखील गुगलने म्हटले आहे.



वायफाय बंद करण्याचा निर्णय कंपनीने मोबाईल डाटाचे प्लॅन परवडणाऱ्या दरात राहण्यासाठी घेतला आहे. तसेच जगभरासह भारतात मोबाईलची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी सेवा बंद करण्यात आली आहे. प्रति जीबी सर्वात स्वस्त मोबाईल डाटा मिळणाऱ्या देशापैकी भारत आहे. ट्रायच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात मोबाईल डाटाचे दर 95 टक्क्यांनी कमी झाले आहे, अशी माहिती गुगलकडून देण्यात आली आहे. आता उपलब्ध झालेल्या स्वस्त आणि वेगवान इंटरनेटशी स्पर्धा करून सेवा अखंडितपणे सुरू ठेवणं अवघड असल्याचं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 2018 पर्यंत गुगल स्टेशनवर सुमारे 80 लाख प्रति महिना वापरकर्ते रजिस्टर झाले होते. देशभरातल्या 400 रेल्वे स्थानकांवरची ही आकडेवारी आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये देशातली कनेक्टिव्हिटी आणि सेवा सुधारली असल्याचं गुगलनं आपल्या पत्रकात नमूद केलं आहे.

आता रेलटेल देणार सेवा 

गुगलची सेवा बंद झाल्यानंतर आता रेलटेल देशातील चारशेहून अधिक रेल्वेस्थानकांवर फ्री वायफाय देणार आहे. भारतातील ज्या रेल्वे स्टेशनवर गुगलसोबत रेलटेलची भागीदारी होती त्या सर्व स्थानकांवर रेलटेलकडून फ्री वायफायची सुविधा देण्यात येणार आहे, असं रेलटेलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.