मुंबई : 'गणपती बाप्पा चांगल्या लोकांची विघ्न दूर करतो, आमच्यावरचं ईडीचं संकट बाप्पा नक्की दूर करेल', अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जोशी यांच्या घरी आज गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या निमित्ताने 'एबीपी माझा'सोबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.


मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांची काही दिवसांपूर्वी कोहिनूर मिल प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे याप्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. याबाबत बोलताना मनोहर जोशी यांनी आपल्या मुलाच्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही, ईडीचं संकट बाप्पा दूर करेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी मनोहर जोशींनी प्रतिक्रिया दिली आहे. "छगन भुजबळ एक चांगला कार्यकर्ता आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत चांगली आहे. भुजबळ कामाला लागले की ते काम करतात. त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे. पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम असतो. त्यांच्यापुढे कोणी जात नाही", असं जोशी म्हणाले.

“उन्मेष गैर मार्गानं जाणार नाही, ईडीची कारवाई राजकीय हेतू नव्हे”- मनोहर जोशी