सुरमई, बोंबील, पापलेट; महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरुन मासे गायब
एबीपी माझा वेब टीम | 24 Apr 2018 04:01 PM (IST)
खवय्यांच्या आवडीचे कुपा, रावस, बोंबील, सुरमई, पापलेट, बांगड्यासह जवळा आणि करदीचाही तुटवडा निर्माण झाला आहे.
मुंबई : सुरमई फ्राय, बोंबलाचं तिखलं, भरलेला पापलेट, रावस फ्राय आणि बांगडा करी...आता हे सगळं विसरा. कारण मुंबईकरांसह कोकणावासियांचं अन्नातील प्रमुख घटक असलेले विविध मासे महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरुन गायब झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून माशांनी महाराष्ट्राचा किनारा सोडला आहे. खवय्यांच्या आवडीचे कुपा, रावस, बोंबील, सुरमई, पापलेट, बांगड्यासह जवळा आणि करदीचाही तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी माशांचा भाव चांगलाच वधारला आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर गोवा, गुजरात, केरळ आणि कर्नाटकातल्या महाकाय बोटी येऊन मासेमारी करत आहेत आणि त्याचा थेट परिणाम माशांच्या प्रजननावर होत आहे. मच्छिमार वापरत असलेल्या पर्सिसन जाळ्यांमुळे मोठ्या माशांसह लहान मासेही अडकून मरतात. त्यामुळे ही जाळीही मासेटंचाईचं कारण समजलं जात आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरुन मासे गायब झाल्याने सुमारे 22 लाख मत्स्यव्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पण आपल्या मंत्र्यांना मात्र कुठेही मासळीचा तुटवडा जाणवत नाही. मच्छिमारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सरकार मच्छिमारांच्या पाठिशी आहे, असं राज्याचे पदुम मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं. आता सरकारचा दावा खरा की खोटा माहित नाही. पण खरंच परप्रांतीय बोटींमुळे महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरून आणि घराघरातल्या ताटांमधून मासे हद्दपार होणार असतील तर त्यांना तातडीने लगाम घालण्याची गरज आहे.