मुंबई : रस्ते घोटाळ्याप्रकरणी 10 लेखपालांना अटक झाल्यानंतर आता कंत्राटदारांवर कारवाई सुरु झाली आहे. या घोटाळ्याप्रकरणी रेलकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या दीपन शाह या कंत्राटदाराला अटक करण्यात आली आहे. कंत्राटदाराला करण्यात आलेली ही पहिलीच अटक आहे.


 

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर आयुक्तांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यातून मुंबईत रस्ते घोटाळा झाल्याचं धक्कादायक सत्य बाहेर आलं होतं.

 

दरम्यान, महापालिकेच्या 10 लेखपालांना अटक झाल्यानंतर कंत्राटदारांना फरार घोषीत करण्यात आलं होतं. मात्र आता याप्रकरणी पहिल्या कंत्राटदाराला अटक झाली असून इतर कंत्राटदारांचा पोलिसांकडून शोध शुरु आहे.

 

दीपन शहाला अटक

 

2013 साली दीपन शहा यांना मुंबई महापालिकेनं तब्बल 600 कोटी रुपयांची रस्त्याची कामं दिली. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांचं बांधकाम, दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी रेलकॉनवर होती. मात्र मुलुंड आणि पश्चिम उपनगरातील काही रस्ते रेलकॉनच्या आशीर्वादानं खड्ड्यात गेले.

 

वेळोवेळी तक्रारी झाल्या, पण दुरुस्तीच्या नावानं बोंब. अखेर रस्ते घोटाळ्याची चौकशी सुरु झाली, आणि रेलकॉनचं पितळ उघडं पडलं.

 

मुंबई पालिकेला 6 कंत्राटदारांनी मिळून तब्बल 352 कोटी रुपयांचा गंडा घातला. त्याची तक्रार खुद्द महापौरांनीच केली. मग आयुक्तांच्या देखरेखीखाली चौकशी झाली. कामं न करताच कंत्राटदारांनी बिलं उचलल्याचं समोर आलं. त्यानंतर पालिकेच्या 10 लेखापरीक्षकांसह कंत्राटदारांच्या इंजिनिअर्सना अटक झाली. आणि गेल्याच आठवड्यात पालिकेचे दोन मुख्य अभियंतेही जाळ्यात अडकले.

 

रेलकॉनच्या दीपन शहांना झालेल्या अटकेने पोलिसांनी पाठ थोपटून घेण्याची गरज नाही.

 

कारण अजूनही के. आर. कन्स्ट्रक्शन, आर. के. मदानी कन्स्ट्रक्शन, जे. कुमार. कन्स्ट्रक्शन, आर. पी. शहा कंन्स्ट्रक्शन्स आणि  महावीर कंन्स्ट्रक्शन्सचे संचालक तब्बल दोन महिन्यानंतरही फरार आहेत.

 

शिवसेना - भाजप संघर्षाची किनार

 

नालेसफाई, रस्ते घोटाळ्याला शिवसेना विरुद्ध भाजपच्या संघर्षाची किनार आहे. घोटाळे बाहेर काढणं आणि चौकशा लावण्याचा सपाटा सुरु आहे. मात्र ज्यांनी काळ्या यादीतल्या लोकांना कंत्राटं देताना तोंडं बंद ठेवली. त्यांचं काय? रेलकॉनसारखे कंत्राटदार पालिकेला लुटत असताना अधिकारी, महापौर, स्थायी समिती काय करत होती? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळं जनतेचे खरे गुन्हेगार कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

 

गणेश ठाकूर, मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई