मुंबई : घाटकोपर येथील इमारत दुर्घटनेतील आरोपी सुनील शितपनं जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात केलेला अर्ज मागे घेतला आहे. या अर्जावर आधी सत्र न्यायालयात सुनावणी होणं गरजेचं असल्याचं सांगत हायकोर्टानं यावर सुनावणी करण्यास नकार दिला.


न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सत्र न्यायालयानं शितपचा जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र पुरवणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर शितपकडे पुन्हा सत्र न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

पोलिसांनी या प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यामुळे आता चौकशीसाठी कोठडीची आवश्यकता नाही, असा दावा शितपकडनं करण्यात आलाय. शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सुनील शितपप्रमाणेच त्या इमारतीत नूतनीकरणाचं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स, आर्किटेक्ट यांनाही सहआरोपी करण्यात आलंय.

सुनील शितपकडून सदर इमारतीतील सदस्यांना धमकावलं जात होतं. सुनील शितपला आपण करत असलेल्या कृत्याची पूर्ण माहीती होती, असा पोलिसांचा दावा आहे. मात्र सुनील शितपच्या वतीने कोर्टात बचाव करताना, इमारतीच्या मूळ बांधकामात कोणताही बदल नाही, असा दावा करण्यात आला आहे.

इमारत जुनी झाल्यानं ती धोकादायक अवस्थेतच होती. त्यामुळे आपल्यावर होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत असं सुनील शितपच्या वतीने कोर्टात सांगण्यात आलं आहे.