खंडणी वसूल करणारे तोतया सीआयडी पोलीस गजाआड
एबीपी माझा वेब टीम | 14 Dec 2018 08:55 PM (IST)
सीआयडी बी टीमचे पोलीस असल्याचे भासवून लोकांकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीला भिवंडीत पोलिसांनी अटक केली आहे.
भिंवंडी : एका एनजीओ संस्थेच्या नावाआड सीआयडी बी टीमचे पोलीस असल्याचे भासवून लोकांकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीला भिवंडीत पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडी पोलिसांनी 50 हजारांची खंडणी घेताना या टोळीला रंगेहात पकडले आहे. या तोतया पोलिसांच्या टोळीतील चार जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने शेअर मार्केटमीधील ब्रोकरला धमकी देऊन वीस लाखांची खंडणी मागितली होती. सुरुवातीला या टोळीने ब्रोकरकडून ७० हजार उकळले. त्यानंतर ५० हजार रुपये घेताना भिवंडी गुन्हे शाखेने या टोळीला रंगेहात पकडले. भिवंडी शहरातील टेमघर येथील उच्चभ्रू वस्तीत वास्तव्यास असलेले मनोज बारीक हे शेअर मार्केट ट्रेडींग व्यवसाय करतात. त्यांना कल्याण रोड येथील उत्सव हॉटेल या ठिकाणी असिफ जियाउद्दीन खान व आदिल फारुख अन्सारी व त्याच्या चार जणांच्या टोळक्याने फोन करून बोलावले. या टोळीने मनोज बारीक यांना त्यांच्याकडे असलेले क्राईम इन्व्हेस्टीगेशन अँड डिटेक्शन ब्युरो आणि ह्युमन राईट्स अँटी क्राईम अँड अँटी करप्शन ऑर्गनायझेशन या एनजीओ संस्थांचे व्हिजिटिंग कार्ड दाखवले. ते दाखवत असताना ते चौघे सीआयडीच्या बी टीममधील पोलीस असल्याचे सांगितले. या टोळीने मनोज बारीक यांना तुम्ही शेअर मार्केटमध्ये नागरिकांच्या पैशांची गुंतवणूक करून फसवणूक करता आणि पळून जाता, तुमच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी लागेल, असे सांगितले. या गुन्ह्यातून तुम्हाला सुटका हवी असल्यास 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यानंतर आनंद हॉटेल, गैबीनागर येथे यांनी ७० हजार रुपये घेतले. यादरम्यान मनोज बारीक यांना या तोतया पोलिसांबद्दल संशय आल्याने त्यांनी भिवंडी गुन्हे शाखेत जाऊन या पोलिसांबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यांना समजले की त्यांची फसवणूक झाली आहे. त्यानंतर बारीक यांनी याबाबतची तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून या तोतया पोलिसांना अटक केली.