मुंबई : अरबी समुद्रात बांधल्या जाणाऱ्या शिवस्मारकामुळे पर्यावरणाला कोणताही धोका होणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने केंद्रीय हरित लवादाला पाठवलं आहे. सरकारच्या या भूमिकेवर पर्यावरणवादी आणि मच्छिमार संघटनांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.


शिवस्मारकाच्या बांधकामामुळे अरबी समुद्रातल्या जैवविविधतेला धोका निर्माण होईल, असा दावा करत पर्यावरणवाद्यांनी हरित लवादामध्ये याचिका दाखल केली होती. त्याच याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारनं पाठवलेल्या पत्रात या प्रकल्पामुळे कोणतीही हानी होणार नसल्याचा दावा केला आहे.

भर समुद्रात बांधकाम करुन जर पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, असं सरकारला वाटत असेल, तर सरकारच्या दृष्टीने 'पर्यावरण म्हणजे नेमकं काय?' असा सवालही पर्यावरणतज्ज्ञ आनंद पेंढारकर यांनी उपस्थित केला आहे.

शिवाजी महाराजांचे स्मारक मुंबईतील कफ परेडजवळच्या समुद्रात बांधण्याची तयारी राज्य सरकारने सुरु केली आहे. मात्र पर्यावरणाला धोका असल्याने स्मारक समुद्रात उभारण्यात येऊ नये, असं सांगत पर्यावरणतज्ज्ञ प्रदीप पाताडे आणि अखिल मच्छीमार कृती मंडळाचे संचालक दामोदर तांडेल यांनी पुण्यातल्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली.