मुंबई: घाटकोपरमध्ये झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. या ठिकाणी बचावकार्य सुरू असून आतापर्यंत 47 जखमींना बाहेर काढून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


काय म्हणाले मुख्यमंत्री? 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, घाटकोपरमध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी असून त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग तातडीनं हटवण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कारवाई करण्यात येईल. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा फोनवरुन आढावा घेतला असून घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग तातडीनं हटवण्याचे आदेश दिले आहेत. होर्डिंगखाली अडकून जखमी झालेल्या नागरिकांच्या भेटीला मुख्यमंत्री राजावाडी रुग्णालयात जाण्याची शक्यता आहे. तसेच अवकाळी पावसामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस


घाटकोपरमध्ये झालेली घटना दुर्दैवी असून त्या ठिकाणी बचाव पथकाचं काम सुरू आहे. घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 47 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. 


 




नेमकं काय घडलं? 


अचानक झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने आज मुंबईत दाणादाण उडाल्याचं दिसून आलं. मुंबईत आज दोन मोठे अपघात घडले. घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. होर्डिंगखाली जवळपास 80 वाहनं अडकल्याची माहिती समोर आली आहे. या होर्डिंगखाली 100 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून आत्तापर्यंत 47 जणांना बाहेर काढलंय. 


जखमींना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर दुर्घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. दुर्घटनास्थळी पेट्रोल पंप, सीएनजी ज्वलनशील पदार्थांमुळे गॅस कटर वापरण्यात अडचणी येत आहेत. होर्डिंगचा प्रचंड आकार आणि त्याखाली अडकलेल्या वाहनांची संख्या पाहता दुर्घटनेची भीषणता लक्षात येईल. 


अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पेट्रोल पंप आणि सीएनजी पंपामुळे इथला ज्वलनशीलतेचा धोकाही वाढलाय. त्यामुळे या भागातून नागरिकांना दूर करण्यास प्रशासनाने आणि पोलिसांनी सुरूवात केली. तर एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. 


ही बातमी वाचा: