शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही : खडसे
एबीपी माझा वेब टीम | 31 Jan 2018 03:09 PM (IST)
'शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही. त्यांनी आधी सत्तेतून बाहेर पडावं आणि मग भाजपच्या लोकांवर टीका करावी.'
मुंबई : 'शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही. त्यांनी आधी सत्तेतून बाहेर पडावं आणि मग भाजपच्या लोकांवर टीका करावी.' अशा शब्दात भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेनं 'सामना'तून केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. 'शिवसेनेची सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत नाही. त्यामुळे ते सत्तेत राहूनच भाजपवर टीका करत राहतील.' असंही यावेळी खडसे म्हणाले. नेमकं प्रकरण काय? 'एकनाथ खडसे यांना काँग्रेस- राष्ट्रवादीकडून खुली ऑफर आहे. मात्र पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच. या जन्मातलं कर्माचं फळ याच जन्मात फेडायचं असतं', अशी तिखट शिवसेनेने ‘सामना’ या मुखपत्रातून केली होती. खडसेंनी सत्तेचा वापर करुन मुक्ताईनगरातील शिवसेना जिल्हाप्रमुख आणि इतरांना संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तीच सत्ता आज खडसेंवर उलटली आहे, असं सामनामध्ये म्हटलं आहे. “खडसे सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंचावर दिसतात. चारित्र्य, निष्ठा वगैरेंवर बोलत असतात. मीच हरिश्चंद्राचा अवतार असून भाजपने माझे पंचप्राण परत देऊन लाल दिव्याच्या पालखीत बसवावे असे त्यांना वाटत असले तरी सध्या यमाला शरण आणणारे मांगल्य राजकारणात उरले आहे काय? या जन्मातील कर्माचे फळ याच जन्मात फेडायचे असते. खडसे तेच कर्मफळ भोगीत आहेत”, असं टीकास्त्र ‘सामाना’तून सोडलं आहे. खडसे हिरो बनायला निघाले होते, पण राजकीय मंचावर त्यांना साईड रोल मिळाला. मात्र मुख्यमंत्र्यांनी तोही काढून घेतला. त्यामुळे खडसे आज भाजपच्या राजकारणातून बाद झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांना ते पूर्वीचे स्थान उरलेले नाही. जेथे फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ नाथाभाऊ खडसेंवर का यावी, हा राजकीय अभ्यासाचा विषय आहे, असं सामनात नमूद करण्यात आलं आहे. संबंधित बातम्या : पदर ढळल्यावर ऑफर यायचीच, ‘सामना’तून खडसेंवर वार