कल्याण : राज्यात पीएमसी बॅंक घोटाळ्यानंतर आता गुडविन ज्वेलर्सचा घोटाळा समोर आला आहे. कारण या ज्वेलर्सनं हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावत रातोरात दुकानं बंद केली आहेत. त्यामुळं हक्काचा पैसा परत मिळेल की नाही? या विवंचनेत सध्या गुंतवणूकदार आहेत.


गुडविन ज्वेलर्स हे गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या अनेक प्रमुख शहरात विस्तारलेली ज्वेलर्सची साखळी आहे. मात्र 21 ऑक्टोबर रोजी ही दुकानं बंद झाली ती कायमचीच.  या ज्वेलर्सनं हजारो ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. या ज्वेलर्सच्या शाखांमध्ये भिशी, आरडी, फिक्स डिपॉझिट अशा विविध योजनांच्या नावाखाली सर्वसामान्यांनी कोट्यवधी रुपये गुंतवले होते. कुणी मुलांच्या शिक्षणासाठी, तर कुणी त्यातून मिळणाऱ्या व्याजावर घर चालवण्यासाठी पैसे गुंतवले होते. मात्र एका रात्रीत हे सगळं बुडाल्यात जमा झालं आहे.

या ज्वेलर्सच्या सर्व शाखांबाहेर 21 ऑक्टोबर रोजी एक नोटीस लावण्यात आली आहे, ज्यात दुकान दोन दिवस बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र त्यानंतर गेला आठवडाभर हे दुकान उघडलेलंच नाही. त्यामुळं धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी थेट पोलिसात धाव घेतली आहे.

गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सचे मालक आणि मॅनेजरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर त्यांच्या शोधासाठी त्यांच्या घरीही पोलीस धडकले. मात्र धक्कादायक बाब म्हणजे हे सगळे 21 ऑक्टोबरलाच राहतं घर रिकामं करून परिवारासह गायब झालेत. त्यामुळं हा फसवणुकीचा पूर्वनियोजित कट होता का? अशी शंका व्यक्त होत आहे.

गुडविन ज्वेलर्समध्ये अनेकांनी मोठ्या रकमाही गुंतवल्या आहेत. त्यामुळं निश्चितपणे हा फसवणुकीचा आकडा अनेक कोटींमध्ये असण्याची शक्यता आहे.