कार्टूनमुळे शिवसेनेची मराठा मोर्चाबाबतची भूमिका समजली : मुंडे
एबीपी माझा वेब टीम | 27 Sep 2016 04:30 PM (IST)
मुंबई : मराठा मूक मोर्चाबाबत 'सामना'ने जे व्यंगचित्र छापलं, त्यामुळे शिवसेनेची भूमिका समोर आली. या व्यंगचित्रामधून मराठा समाजाच्या, शहिदांच्या, पोलीसांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे सरकारने 'सामना'वर कारवाई करावी अशी मागणी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. मराठा मोर्चात शेतकरी राज्यात लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघत आहेत. प्रामुख्याने हा समाज शेतकरी समाज आहे. या समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज आहे. या सरकारने आरक्षण दिलं नाही म्हणून या समाजाचा हा रोष मोर्चामुळे दिसतो, असं धनंजय मुंडे म्हणाले. मराठा अरक्षणासंबंधी सरकारने दोन दिवसात भूमिका स्पष्ट करावी, समाजाचा अंत पाहू नये; असं अल्टिमेटम धनंजय मुंडे यांनी दिलं. कोपर्डीच्या प्रकरणात अजूनही चार्जशीट दाखल झालं नाही. सरकारने ही काय थट्टा चालवली आहे? असा सवाल त्यांनी केला. आरक्षण देण्यासाठी जर कायद्यात काही बदल करावे लागणार असतील, तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारला सर्व पाठिंबा द्यायला तयार आहोत, असं मुंडे म्हणाले. सरकारने मराठा आरक्षणाबाबतीत मंत्री गट स्थापनेची घोषणा केली, मात्र विरोधीपक्ष नेत्यांना मंत्र्याचा दर्जा नाही. त्यामुळे चर्चा करण्यात वेळ घालवू नये, निर्णय घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.