मुंबई : मुंबईतील बहुचर्चित आरे कारशेडच्या कामाला अखेर नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे.  जोपर्यंत या कामाची चौकशी होऊन पर्यायी मार्ग निघत नाही तोपर्यंत आरेतलं आता एक पानही तोडलं जाणार नाही, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. फेसबुक पोस्ट करत फडणवीसांनी म्हटलं आहे की, मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच आहे. जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे 15,000 कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते. अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि 15 वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील, असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.


आरे कारशेडला स्थगिती, मेट्रोला नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

आरे कारशेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. जोपर्यंत या कामाची चौकशी होऊन पर्यायी मार्ग निघत नाही तोपर्यंत आरेतलं आता एक पानही तोडलं जाणार नाही, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. रातोरात झाडांची कत्तल कधीही मान्य नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे. पूर्ण कामाची पाहणी करुनच पुढील निर्णय घेतला जाईल. आपले वैभव नष्ट करुन विकास आम्हाला नको आहे, असेही ते म्हणाले होते.

आरेतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा, विरोधातील सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या

आरेतील वृक्षतोड आणि या कारशेडला शिवसेनेने पहिल्यापासून विरोध केला आहे. आता या कारशेडच्या कामाला स्थगिती देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या सरकारच्या निर्णयाला पहिला दणका दिला असल्याचं बोललं जात आहे. मेट्रो प्रकल्पाला स्थगिती नाही, पण कारशेडला स्थगिती दिली असल्याचे ठाकरेंनी सांगितलं आहे.

शिवसेनेचा सुरुवातीपासून विरोध

आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. सत्तेत आल्यावर आरेला जंगल घोषित करणारच, असे म्हणत आदित्य यांनी तत्कालीन भाजप सरकारला इशारा दिला होता. आरे मेट्रो कारशेडप्रकरणी हायकोर्टाने हिरवा कंदिल दाखवत कारशेडसाठीच्या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्याचा आदेश येताच रात्रीत आरे कॉलनीमध्ये वृक्षतोड करण्यात आली होती. वृक्षतोडीला सुरुवात होताच पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध केला होता. तसेच या विरोधात नागरिकांनी आंदोलनं देखील केली होती. सर्वोच्च न्यायालयात हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याआधीच झाडे तोडल्याने नागरिकांनी राज्य सरकार, मेट्रो प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला होता.


संबंधित बातम्या

आरेतील मेट्रो भवन निर्मितीला सुरुवात   

'आरे'तील वृक्षतोडीला नागरिकांचा 'कारे', धरपकडीनंतर अनेक आंदोलक ताब्यात