नवी दिल्ली : टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरुन काढून टाकण्यात आलेले सायरस मिस्त्री कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. टाटा सन्सच्या निर्णयाविरोधात मिस्त्री मुंबई हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याची माहिती आहे.


सायरस मिस्त्री यांच्या जागी पुन्हा रतन टाटा चेअरमनपदाची धुरा सांभाळणार आहेत. चार महिन्यांसाठी रतन टाटा पदावर असतील. त्यानंतर सर्च पॅनेल नव्या चेअरमनची निवड करेल.

सायरस मिस्त्री यांनी चार वर्षापूर्वीच म्हणजे 2012 मध्ये टाटा समूहाच्या चेअरमनपदाची धुरा खांद्यावर घेतली होती. त्यावेळी रतन टाटांनी सायरस मिस्त्री ही जबाबदारी समर्थपणे सांभाळतील असा विश्वास व्यक्त केला होता.

सायरस मिस्त्रींना 'टाटा', चेअरमनपदी पुन्हा रतन टाटा !


सायरस मिस्त्री त्यावेळी शापूरजी पालोनजी ग्रुपचे प्रबंध निर्देशक होते. सायरस मिस्त्री 2006 पासून टाटा ग्रुपच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये आहेत. सायरस मिस्त्री यांचं शिक्षण लंडनमध्ये झालंय. इंपेरियल कॉलेजमध्ये त्यांनी सिव्हिल इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. सायरस मिस्त्री यांनी त्यानंतर लंडन बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटमधून शिक्षण घेतलं.

एक लाखांत चार चाकी गाडीचे स्वप्न ते जॅग्वारसारख्या बड्या कंपनीतील भागीदारी, अशा तमाम विक्रमांना नावावर करणारे रतन टाटा चार वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा चार महिन्यांसाठी ते चेअरमनपदी विराजमान होतील.