ठाणे : कल्याणच्या आधारवाडी क्षेपणभूमीवर कोविडशी संबंधित कचरा उघड्यावर टाकला जातोय, अशी तक्रार करत हायकोर्टात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर सध्याच्या परिस्थितीत ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसह राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.


डोंबिवलीचे स्थानिक रहिवासी किशोह सहानी यांनी अॅड. साधना कुमार यांच्यामार्फत ही याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसाला हजारोंनी वाढत असताना कल्याणच्या आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर कोविड 19 शी संबंधित कचरा कोणतीही जैविक प्रक्रिया न करता टाकला जातोय. प्रत्यक्षात या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. जेणेकरुन आसपासच्या परिसरात या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. मात्र, इथं तसं होताना दिसत नाही असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.

ठाण्यापाठोपाठ कल्याण डोंबिवलीतही 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती नीतीन जामदार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. तेव्हा या आरोपांची शहानिशा करण्यासाठी थोडा वेळ हवा, अशी मागणी प्रशासनाच्यावतीनं करण्यात आली. तेव्हा दोन आठवड्यांत यावर सविस्तर उत्तर सादर करण्याचे निर्देश देत, हायकोर्टानं ही सुनावणी तहकूब केली.

कल्याण डोंबिवलीतही 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन

ठाण्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिकेनेही 2 जुलैपासून 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. केडीएमसीमध्ये 2 जुलै सकाळी सात वाजल्यापासून 12 जुलै सकाळी सात वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. यादरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊन करणं गरजेचं असल्याचं मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवशी यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये अत्यंत प्रभावीपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल, असं आयुक्तांनी सांगितलं.

Thane Lockdown | ठाण्यात उद्यापासून लॉकडाऊन, आज भाजी खरेदीसाठी झुंबड!