Coronavirus Mumbai देशात कोरोना रुग्णांच्या आकड्यात सातत्यानं होणारी वाढ हजारांवरून आता दर दिवशी तीन लाख नवे रुग्ण इतक्या मोठ्या फरकानं झाली आहे. रुग्णसंख्येत होणारी ही वाढ देशातील आरोग्य यंत्रणांपुढं असणारं आव्हान आणखीनच बिकट करताना दिसत आहे. पण, प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग, या संकटाच्या काळात झटणारी पोलीस यंत्रणा या साऱ्यांच्या अथक परिश्रमांतून कोरोनाचं हे सावटही टळण्याचं चित्र आहे. 


सध्याच्या घडीला महाराष्ट्रातही कोरोना रुग्ण बरे होण्याचा आकडा सुधारत असताना मुंबईतही सलग अशाच पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे. गुरुवारी मुंबई महानगरपालिकेनं प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार शहरात 8090 कोरोना रुग्णांनी या संसर्गावर मात केली. तर, 7410 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यावेळी रुग्णसंख्या दुपटीचा वेग हा 50 दिवस इतका होता. 


Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर 


शुक्रवारी पालिका प्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 7221 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर तब्बल 9541 कोरोना रुग्णांनी या विषाणूवर मात केली. ज्यामुळं आता एकूण कोरोनातून सावरणाऱ्या रुग्णांचा दर 84 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, रुग्णवाढ दुप्पटीचा दर 52 दिवसांवर पोहोचला आहे. कोरोाग्रस्तांचे बरे होण्याचे हे आकडे पाहता मुंबईत हेच चित्र कायम राहिल्यास पुन्हा एकदा हे शहर कोरोना नियंत्रणात आणण्यास यशस्वी ठरेल, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 










महाराष्ट्रातील कोरोना सद्यस्थिती काय सांगते? 


शुक्रवारी 66  हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.  दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. राज्यात आज 773 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे करोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याचं समोर येऊ लागलं आहे.


राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज  66 हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 74 हजार 045 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 04 हजार 792 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.81 टक्के  झाले आहे. राज्यात आज 773 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे.