मुंबई : "कोरोनापासून बचावासाठी होम क्वॉन्टाईन किंवा हॉस्पिटल क्वॉरन्टाईन हे दोनच पर्याय आज उपलब्ध आहेत. कोरोनामुळे हॉस्पिटल क्वॉरन्टाईन होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेने होम क्वॉरन्टाईन होऊन स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं," असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, असं ते म्हणाले.


कोरोनाबाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णांची संख्या वाढतेय, बाजारातल्या गर्दीमुळे कोरोना तुमच्या घरात पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. कोरोनासंदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, त्याची सुरुवात काल झाली आहे, असंही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.


राज्य सरकारनाने आवाहन केल्यानंतर अनेक खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने, हॉस्पिटल सुरु केले आहेत. परंतु ज्यांनी दवाखाने अजूनही सुरु केलेले नाहीत त्यांची नोंद राज्य सरकारने आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईल, असंही अजित पवार यांनी सांगितलं.


राज्यात अन्नधान्याचा, खाद्यतेलाचा, दूध, भाजीपाल्याचा, औषधांचा, इंधनाचा मुबलक साठा आहे. या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करु नये. दिल्लीतील मरकज घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामूदायिक मेळावा आयोजित करु नये, त्याला परवानगी दिली जाणार नाही, असंही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आज राज्यात रामनवमी भक्तीभावानं, साधेपणाने साजरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यापुढेही सर्व सण, उत्सव साधेपणानं साजरे व्हावेत, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.


Coronavirus | कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची खैर नाही : अजित पवार