मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम पुढे घेता येईल का, याचा जाणकारांनी विचार करावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रामनवमीनिमित्त गीत रामायणाच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरही भाष्य केलं.


"नुकतंच दिल्लीत तब्लिगीच्या वतीने निजामुद्दीन मरकजचं आयोजन केलं होतं. त्यात हजारो लोक सामील झाले. नंतर ते आपापल्या राज्यात, गावात गेले. त्यापैकी काही जणांमुळे कोरोना झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. आजची स्थिती लक्षात घेऊन लोकांनी काहीतरी पथ्ये पाळायची असतात. तब्लिगींना या कार्यक्रमाचं आयोजन टाळता आलं असतं," असं शरद पवार म्हणाले.


यासोबत मुस्लीमांनी शब-ए-बारातला घरातूनच नमाज अदा करावी असं आवाहन शरद पवार यांनी केलं. शिवाय आंबेडकर जयंतीचा कालावधीत बदल करणं शक्य आहे का याबद्दल जाणकारांनी विचार करावा, असं पवार म्हणाले.


आंबेडकर जयंतीच्या कालावधीत बदल करणं शक्य आहे का?
शरद पवार म्हणाले की, "14 एप्रिल हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा आपण जवळपास महिना-दीड महिना साजरा करत असतो. सध्याच्या घडीला हा सोहळा साजरा करण्याचा प्रसंग आहे का याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. यावेळी हा कार्यक्रम पुढे नेणं शक्य आहे का याचा विचार निश्चितपणे करण्याची गरज आहे. आपण सामूहिकरित्या एकत्र आलो तर नवीन समस्यांना तोंड देण्याचा प्रसंग ओढावेल याची शक्यता नाकारता येत नाही. बाबासाहेबांचं स्मरण आपण करुया, त्यांच्या योगदानाची आठवण ठेवूया. परंतु त्याच्या कालावधीत बदल करणं शक्य आहे का याचा विचार जाणकारांनी करावा."


शब ए बारातला घरात राहून नमाज अदा करा
8 एप्रिल हा शब ए बारात या दिवशी मुस्लीम मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. कब्रस्थानात जातात आणि हयात नसलेल्या नातेवाईकांना आदरांजली वाहतात. परंतु लोकांनी घरातूनच नमाज अदा करावी. एकत्र येऊन कब्रस्थानात जाण्याची ही वेळ नाही. जे निजामुद्दीनला घडलं ते 8 एप्रिलला घडू देणार नाही, याची खबरदारी घ्या.


सैन्याला बोलावणं हा शेवटचा पर्याय
फेसबुक लाईव्हदरम्यान एका व्यक्तीने सैन्याला बोलावण्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले की, "एकीकडे देश चिंतेत आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख वारंवार आवाहन करत आहेत. 90 टक्के लोक सूचनांचं पालन करत आहेत. पण 10 टक्के लोक अजूनही हे नियम पायदळी तुडवत आहेत. सैन्य बोलावणं ही अगदी शेवटची वेळ आहे. परकीयांविरोधात सैन्याला बोलावलं जातं, स्वकियांविरोधात नाही. आवश्यकता वाटली तर याबाबत निश्चितच विचार केला जाईल."


Sharad Pawar Uncut LIVE | ...तर सैन्य बोलावणं हा शेवटचा पर्याय : शरद पवार