मुंबई : केंद्र सरकारच्या कोरोना लस आणि रेमडेसिवीर इंजेक्शन वितरणावर मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. केंद्र सरकार जी लस देत आहे त्याचं वितरण प्रामाणिकपणे राज्य सरकार करतंय. गरीबांना लस मोफत दिली पाहीजे. नाशिकमध्ये ऑक्सिजनची प्रचंड कमतरता आहे. आणि ऑक्सिजन पळवण्याच्याही घटना घडत आहेत. रेमडेसिवीर देखील कधी पुण्याला घेऊन जातात तर कधी ठाण्याला घेऊन जातात आणि आम्हाला 200 आणि 300 ही येत नाहीत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. केंद्र सरकार 100 टक्के अन्याय करत आहेत. रेमडेसिवर इंजेक्शन जेव्हा केंद्र सरकारचा हस्तक्षेप नव्हता तेव्हा आम्हाला 36 हजार मिळत होते आणि केंद्राने तो कार्यक्रम हातात घेतल्यावर ही संख्या 26 हजारांवर आली. हे 26 हजार रेमडेसिवीर देखील वेळेवर मिळत नाहीत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. 


रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी कसलं श्रेय घेता?


रेमडेसिवीर काय विरोधी पक्ष नेत्यांच्या घरात बनतं का? त्यांना पुरवतं कोणं? याच देशातील फार्मा कंपन्या ते तयार करतात. उपकार करतात का ते महाराष्ट्रावर? फक्तं भाजप करतंय असं ते सांगतात पण ते काहीच करू शकत नाहीत. सर्वानी मिळून काम केलं तर हा कोरोना आटोक्यात येणार आहे, असं छगन भुजबळ म्हणाले. 


मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगावर ताशेरे आढलेले आहेत. पंतप्रधानांना परदेशतील वाँशिंग्टन पोस्ट, गार्डियन, न्यूयॉर्क टाईम्स सारख्या वृत्तपत्रांनी झोडून काढलेलं आहे.  कोरोनावर उपायोजना करण्याऐवजी पंतप्रधान कुंभमेळा अणि निवडणूक प्रचाराकडे लक्ष देत होते वेळ देत होते. लॉकडाऊनमुळे रुग्ण संख्या कमी होतेय. काही ठिकाणी ती स्थिर होतेय वाढत नाहीये. लाँकडाऊन वाढवला तर अर्थचक्रच्या बाबतीत नुकसान निच्छित होणार आहे. पण रुग्ण संख्या जी कमी झालीय तीचं श्रेय नक्कीच लॉकडाऊनला देता येईल, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. 


अनिल देशमुखांवरील सीबीआय कारवाईबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, हे तर सर्व दिसत आहे माझ्यापासूनच सांगू शकतो फक्तं सूडाचं राजकारण, संपूर्ण खोटेपणा, सत्यापासून दूर राहून या यंत्रणा काम करत आहेत. हे सर्व अविश्वसनिय आहे. CBI ने चौकशी केली म्हणजे न्याय मिळेल हे तुम्ही आता डोक्यातून काढून टाका. आता वरून जी काही ऑर्डर येईल याला अटकवा म्हणजे अटकवा, सोडा म्हणजे सोडा, असंच आहे.