मुंबईकाँग्रेस नेते नसीम खान यांनी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. त्यावर आपण आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दिलीप लांडे यांनी वेळ मागितल्यानं हायकोर्टानं त्यांना तीन आठवड्यांचा अवधी देत याचिकेवरील सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर यावर शुक्रवारी सुनावणी पार पडली.

 

साल 2019 च्या विधानसभा निवडणुकांत नसीम खान यांचा लांडे यांनी अवघ्या 409 मतांनी पराभव केला होता. चांदिवली विधानसभा मतदार संघातून या दोघांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली होती. नसीम खान यांच्या याचिकेनुसार, 20 ऑक्टोबर 2019 रोजी म्हणजेच मतदानाच्या आदल्या दिवशी शिवसेना कार्याध्यक्ष आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्यासोबत निवडणूक आयोगानं निश्चिात केलेल्या कालावधीपेक्षा जास्तकाळ प्रचार केला होता. या प्रकरणी आपण लांडे यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल केली होती. मात्र निवडणूक आयोगानं आपल्या तक्रारीवर काहीच कारवाई केली नाही, असा दावा नसीम खान यांनी आपल्या याचिकेतून केला आहे. 

 

निवडणूक आयोगानं प्रचारासाठी दिलेल्या मुदतीनंतरही ठाकरे आणि त्यांच्या सहका-यांनी लांडे यांच्यासाठी केलेल्या बेकायदा प्रचारामुळे आपला अवघ्या काही मतांनी पराभव झाल्याचा दावाही खान यांनी या याचिकेतून केला आहे. तसेच या निवडणूक प्रचारात आपण ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याची खोटी चित्रफितही विरोधकांनी समाजमाध्यमाद्वारे सर्वदूर केल्याचा आरोप नसीम खान यांनी याचिकेतून केला आहे.