मुंबई: ज्येष्ठ काँग्रसेचे नेते गुरुदास कामत यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या सर्व पदांसह त्यांनी सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे मुंबई पालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला हा एक मोठा धक्का मानला जातो आहे.

 

'10 दिवसांपूर्वी मी सोनिया गांधींना भेटून निवृत्तीचा विचार बोलून दाखवला. त्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही पत्र पाठवून निवृत्तीबद्दल माहिती दिली. मात्र त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलं नाही. त्यानंतर मी काँग्रेस आणि राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.' असं गुरुदास कामत यांनी दिलेल्या निवदेनात म्हटलं आहे.

 

येत्या काही महिन्यात मुंबईत महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्याआधीच गुरुदास कामत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं राजकारणातून संन्यास घेतल्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढू शकते.

 

गुरुदास कामत यांचा राजकीय प्रवास:


 

1976 साली एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

 

1984 साली पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर

 

पाच वेळा ईशान्य मुंबईमधून लोकसभेत प्रतिनिधित्व

 

2009 ते 2011 यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम

 

केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचाही अतिरिक्त कारभार

 

2014  साली सेनेच्या गजानन किर्तीकरांकडून कामतांचा पराभव